साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात गणेशोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास चलचित्र देखावा !

डोंबिवली : पश्चिम डोंबिवली कुंभारखापाडा येथील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात राष्ट्रीय आणि धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. सेवाकेंद्रातील जेष्ठानां यामुळेच त्यांचे जीवन आनंदाने जगता येत आहे. प्रत्येक कार्यक्रमात येथील स्त्री-पुरुष रममाण होत असून सण-उत्सवात सहभागी होत असतात. यावर्षीही येथील गणेशोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्यात विद्युत रोषणाईसह सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास चित्रित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांसह येथील सहकारी यांनी हा चलचित्र देखावा उभारला आहे.

संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांसह येथील सहकारी येथील वृद्धांची सेवा करतात. येथे दरवर्षी प्रत्येक सण- उत्सव साजरा करताना वृद्ध आपले दुःख, अडचण विसरून साजरा करतात. येथे दहीहंडी उत्सव, तुलसीविवाह, गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी, होळी, रंगपंचमी असे अनेक सण वृद्धाश्रमात साजरे केले जातात.

यावर्षी गणेशोत्सवात साजरा करताना थत्ते म्हणाल्या, यावर्षी सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास उभारण्यात आला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेला असा सप्तशृंगी गड या गडावर देवीला १८ भुज असून दहा फूट देवीची मूर्ती आहे. देवीच्या गाभाऱ्याला तीन द्वार असून शक्ती द्वार चंद्रद्वार व सूर्यद्वार आहेत आणि ह्या तिन्ही दरवाजातून देवीची मूर्ती दिसते. देवीचे तीन प्रमुख उत्सव असतात आणि त्यातला पहिला शाखांभरी पौर्णिमा दुसरा चैत्र नवरात्रोत्सव आणि तिसरा अश्विन नवरात्रोत्सव सप्तशृंगी गडावर साजरी केले जातात. देवी देवतांना त्रास देणारा महिषासुर नावाच्या राक्षसाचा विनाशासाठी देवी देवतांनी देवीची पूजा केली त्यानंतर देवी सप्तशृंगी मातेच्या रूपात प्रकट झाली आणि याच ठिकाणी युद्ध करताना महिषासुराचा वध केला.

प्रभू रामाने सुद्धा वनवासात असताना देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते हे मंदिर १४०० वर्ष जुने आहे.
देवीचे माहेर हे खान्देश असून सासर हे वनी आहे अशी आख्यायिका आहे. गावरी विद्या’ ची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते येते. याचे वर्णन आपल्याला नवनाथांच्या भक्तीसारात दिसून येते देवीच्या आख्यायिकेत असे सांगितले जाते की ज्या वेळेस देवीने ज्या भागात युद्धानंतर केस धुतले तेथील डोंगराचा भाग काळा झाला आहे तर देवीने पान खाऊन ज्या भागात चूळ भरली तो डोंगराचा भाग लाल आहे. महानुभवी लिळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजीतांच्या शस्त्राने लक्ष्मण मुरच्छा येऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.

देवीला पलीकडील मार्कंड पर्वतावरून दुर्गा सप्तशती ऐकू येऊ लागली व ती ऐकण्यासाठी देवीने मान वाकडी केली आणि त्यावेळेसच गडावर एक महिला बैलगाडीत बसून येत असताना बैलगाडीचा तोल जाऊ लागला व तिला वाचवण्यासाठी देवीने सूक्ष्म स्वरूपात जाऊन महिलेचा व बैलाचा जीव वाचवला त्यामुळे ऐकत असलेला मानेचा भाग तसाच वाकडा राहिला. त्यांनी पुढे सांगितले की, गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना आम्हाला जो आनंद मिळतो तो दुसरा कुठलाच नाही. श्री गणेशाला भक्तिभावाने निरोप देताना या केंद्रातच कृत्रिम करून त्या तलावात विसर्जन केले जाते.