डोंबिवली : कष्टकरी व भाजी विक्रेता हॉकर्स युनियनचा महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण सांगून कोपर उड्डाणपुला दरम्यान अडविला. हजारो मोर्चेकरी जमावाला विष्णूनगर पोलीस ठाणे परिसर येथे नेण्यात आले. परंतु महापालिका प्रशासनाने चर्चेची तयारी दाखविल्याने मोर्चाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने आता पुन्हा न्यायालयीन लढा देणार अशी घोषणा युनियाने केली आहे.
कष्टकरी व भाजी विक्रेता हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे आणि सल्लागार प्रशांत सरखोत यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पश्चिमकडील हॉटेल सम्राट येथून मोर्चाला सुरवात करण्यात आली. पालिका प्रशासनाच्या धरसोड वृत्तीच्या विरोधात आणि न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून तसेच युनियनच्या अनेक मागणीकडे केलेले दुर्लक्ष अशा विविध मागण्या घेवून भव्य मोर्चा पालिका विभागीय कार्यालयावर धडकणार होता. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून मोर्चा अडविला. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर यांनी मोर्चाचे शिष्टमंडळ आणि पालिका अधिकारी यांच्याशी मध्यस्ती करून चर्चा घडवून आणली. पूर्वेकडील डोंबिवली विभागीय कार्यालयात पालिका सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित यांनी युनियनच्या शिष्टमंडळाशी फेरीवाले विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. परंतु प्रशासनाच्या उडवाउडवी उत्तरला शिष्टमंडळातील सरखोत, कांबळे, बिरमोळे, दुबे, पाटील यांनी आक्षेप घेतला. मुख्य म्हणजे न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासन काम करीत नसून वेगळ्याच गोष्टीला महत्व देत आहे या सरखोत यांच्या प्रश्नाला बगल दिल्यामुळे पालिका अधिकारी व शिष्टमंडळ यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे आता आम्ही आमची पुढील भूमिका न्यायालयात मांडू असे सरखोत यांची ठासून सांगितले. अशा परिस्थितीमुळे नेहमीप्रमाणे पुढेही फेरीवाल आणि पालिका प्रशासन यांचा वाद चालूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
फेरीवाल्यांमुळे रेल्वे परिसरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्या होत असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार दीडशे मीटर परिसर फेरीवाला मुक्ती म्हणून काल मंगळवारी पूर्व-पश्चिम अशा चौदा रस्त्यांवर पट्टे मारले आहेत. ना निर्णयाला फेरीवाल्यांनी स्वीकारले असून इतर बाबींची पूर्तता करावी या मागणीला जोर धरला आहे. फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र या मुद्द्यावर वाद होत असून आता पुढे कोणती भूमिका पालिका प्रशासन घेते याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.