सारा आकाश ट्रस्टच्या पुढाकाराने मकर संक्रांतीच्या दिवशी आदिवासी पाड्यात मिळाले पाणी

डोंबिवली : आपल्या देशातील प्रत्येक गाव स्मार्ट झाले पाहिजे असे भाजप सरकारने जाहीर केले होते. मात्र आजही अनेक गावात आणि पाड्यात मुलभूत गरजायेथील ग्रामस्थांना मिळत नसल्याचे भयानक सत्य या सरकारच्या समोर आले असूनही त्यांना न्याय मिळत नाही. मात्र अश्या वेळी समाजिक संस्था पुढाकार घेऊन सरकारवर अवलंबून न राहता मदत करतात. कल्याण तालुक्यातील म्हसरोंडी आदिवासी वाडीत सारा आकाश ट्रस्टने मकर संक्रांतीच्या दिवशी पाणी मिळवून दिले. साडेतीन किलोमीटरवर असलेल्या बारवी नदीवर पंप बसवून पाईपलाईनने ते पाणी वाडीत आणून त्यावर गुजरात राज्यातील शुद्धीकरण यंत्रणा बसवून दिली.

कल्याण तालुक्यात ६६ गावे आणि ६६ वाड्या पाडे आहेत. एका बाजूला म्हारळ, वरप, कांबा, नांदप, खोणी वढवली, पिंपरी अशी विकसित गावे तर दुसऱ्या बाजूला म्हसरोंडी, नानेपाडा, आणे पाडा, पठार पाडा, भोंगाळपाडा, वैतागवाडी, झापवाडी, गणेश वाडी, ठाखूरपाडा, नैतरपाडा, बांगर वाडी, पादऱ्याचापाडा, आपटी वाडी आदि वाड्यापाड्यातील गावात वीज, पाणी आणि आरोग्य अशा सोयी उपलब्ध नाहीत. या वाड्या-वस्त्याच्या जवळपास उल्हास, बारवी, काळू अशा बारमाही वाहणा-या नद्या आहेत. परंतु या लोकांनी हे पाणी कधी पाहिलेच नाही. आदीवाशी कातकरी हे डबर, गाळाने भरलेल्या विहिरी, आणि तूटलेल्या बोअरवेल यावरच अवलंबून असायचे.

कल्याण मुरबाड मार्गापासून आणि हिंदू सेवा संघ येथून चार ते पाच किमी अंतरावर जंगलात म्हसरोंडी हे गाव वसले आहे. गावात ३०  ते ४०  घरे असून ती वनजमीनीवर आहेत. त्यामुळे या गावाची नोंद कल्याण तहसीलदार किंवा प्रांताधिकारी कार्यालयात नाही. गावात पाचवीपर्यत शाळा आहे. गावातील महिलांच्या डोक्यावर वर्षाभर हंडा असायचा, आरोग्य सेवेचे बारा वाजलेले. अशाच बिकट परिस्थितीत येथील शाळेवर रविंद्र देवकर यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या जोडीला दिलीप भावार्थे, विशाल आरेकर या सारखे सहकारी शिक्षक मिळाल्याने त्यांनी मदतीसाठी दातृत्वाची शोध मोहीम सुरू केली. यामध्ये सुरुवातीच्या काळात त्रास झाला. परंतु हळूहळू मदतीचे हात पुढे आले. यातून शाळा संगणकीकरण, रंगरंगोटी, शौचालय, इतर साहित्य याची जमवा-जमव केली. येथील सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा? अशातच त्यांची  भेट सारा आकाश ट्रस्टचे रवि नारायण यांच्याशी झाली. जानेवारी २०१७  मध्ये ते वाडीत साहित्य वाटप करण्यासाठी आले होते. त्यावेळी देवकरसरांनी गावांची अडचण सांगितली. त्यांनी ताबडतोब ती मान्य केली. गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतर जंगलातून पायी जाऊन नदी पाहिली. नदीवर पंप बसवून गावातूनच लाईट नेली व चार इंचाची पाइपलाईन टाकली. शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली यावी म्हणून जागोजागी ती ठेवण्यात आले. शिवाय महत्वाचे म्हणजे पाण्याचा टाकी खाली गुजरात राज्यातून आणलेल्या शुद्ध पाणी देणारा फिल्टर मशीन बसून ते शुद्ध पाणी सिंन्टेक्स टाकीत व नळाला जोडण्यात आले. त्याचे उद्घाटन रवि नारायण यांच्या मातोश्री विजयलक्ष्मी नारायण यांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांद्रा कुर्ला कॅम्पलेक्स यांनी गावाततसेच रस्त्यावर एल इडी लाइट लावणार असल्याचे जाहीर केले. तर सारा आकाश ट्रस्टचे रवी नारायण यांनी म्हसरोंडी हे आदीवाशी गाव दत्तक घेतले आहे असे सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र देवकर यांनी पट वाढविल्याचे सांगून गावासाठी कायम झटत राहणार आहे असे सांगितले. सहशिक्षक दिलीप भावार्थे व विशाल आरेकर यांनी बसविलेल्या आदीवाशी मुला मुलींचे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आमच्या आयुष्यात ख-या अर्थाने आज शुद्ध पाण्याने संक्रांत गोड झाली असे आदीवाशी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी संरपच प्रज्ञा ठाकरे, ग्रामसेवक जगदीश देशमुख, सुरोशी काका वंसत आग इवले, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.