न्याय-हक्कासाठी चार वर्षे लढा : खचलेल्या बिल्वदल रहिवासीयांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका डोंबिवली विभागीय प्रभागक्षेत्र 74 पाथर्ली गावठाण मधील बिल्वदल इमारत चार वर्षांपूर्वी म्हणजे 9 ऑगस्त 2014 रोजी खचल्याने तेथील 48 कुटुंबियांना नेसत्या वस्त्रानिशी आपले घर खाली करून संक्रमण शिबिराचा आधार घ्यावा लागला. आजही ती कुटुंबे बेघर असून पाठीवर संसार घेऊन उदरनिर्वाह करीत आहेत. पालिका प्रशासन आणि दमदार लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने अखेर शेवटचा पर्यार म्हणून खचलेल्या बिल्वदल राहिवाशियांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. आता फडवणीस काय भूमिका घेतात यावर ती कुटुंबे अखेरचा निर्णय घेणार आहेत.

मानपाडा रोडवर ‘बिल्वदल’ ही इमारत 9 ऑगस्ट 2014 रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील 48 कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे रहिवाश्यांनी इमारत तातडीने रिकामी केली. या घटनेला 4 वर्षे पूर्ण झाली. एकीकडे या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. तर दुसरीकडे सदर इमारतीच्या रिकाम्या जागेवर भंगारवाल्यांनी कब्जा केला असून मालकानेही बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला आहे.

काही महिन्यांपूर्वी बिल्वदल इमारती प्रमानेच डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगर प्रभागातील ओम शिव-गणेश इमारतीला तडे गेल्याने त्यांनीही इमारत रीकामी केली. तेथिल रहिवाश्यांच्या हितासाठी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी तातडीने आराखडा मंजूर करून त्या त्या कुटुंबाना न्याय देण्याचे जाहीर केले. मात्र बिल्वदल इमारतीतील कुटुंबाना न्याय अद्याप मिळत नाही असा विवेकी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून विचारण्यात आला आहे. पालिका प्रशासनाला 120 वेळा पत्रव्यवहार केला असून महापालिकेसह शासनाकडूनही काहीही हालचाली झाल्या नाहीत. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांचेही पत्रांद्वारे लक्ष वेधले असले तरी कोणाकडूनही न्याय मिळत नाही या शोकांतिकेचा विषय नमूद केला आहे.

दरम्यान बिल्वदलच्या 14 महिला आणि 11 पुरूष असे 25 रहिवासी आमरण उपोषणाला बसले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. परंतु त्यांच्याकडूनही बघू आणि करू अशीच उत्तरे मिळाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही 17 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक लावली होती. दरम्यान पालकमंत्री, महापौर, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. बिल्वदल इमारतीबाबत पालिकेच्या विद्यमान आयुक्तांसह तत्कालीन आयुक्तांनी हा विषय मार्गी लागला नाही. खचलेल्या बिल्वदल इमारतीच्या रिकाम्या जागेवर मालक रेती, खडी, विटांचा व्यवसाय करून स्वतःचा चरीथार्ध साधत असून हक्काची ती कुटुंबे बेघर आहेत याचं खूप दुखः होत आहे. इमारतीची एकूण जागा 6 हजार 534 स्क्वेअरफूट इतकी आहे. सदर जागेवर 2 विंग असलेल्या इमारतीत एकूण 48 रहिवासी वास्तव्य करत होते. आम्हाला बेघर किती दिवस ठेवणार असा प्रश्न संजय मांजरेकर यांनी केला असून सरकारने आम्हाला एफएसआय वाढवून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.