अवाढव्य ‘घरडा सर्कल’ होत आहे वाहतूक कोंडीचे कारण [ स्थानिक नगरसेवकाचे निवेदन केराच्या टोपलीत ]

डोंबिवली : शहरातील महत्वाचा वर्दळीचा रस्ता असलेल्या लोकमान्य टिळक चौक (पारसमणी) ते घरडा सर्कल रस्त्यावर प्रतिदिन वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. कल्याण, शिळफाटा रस्त्याकडे जाणारी बहुतांशी वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. डोंबिवलीतून शहराबाहेर जाणारे दोन मुख्य रस्ते म्हणजे एक मानपाडा तर  दुसरा टिळक चौक रस्ता. गर्दीच्या वेळी मानपाडा रोडवर चक्का जाम होत असून पर्यायी मार्ग म्हणून कल्याण रोडकडे पहिले जाते. परंतु कल्याण फाट्यावर असलेल्या अवाढव्य घरडा सर्कलमुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक शाखेच्या गलथान कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळेच चहूबाजूंनी नाकाबंदी झाल्यासारखे चित्र प्रतिदिन दिसून येत आहे. शाळेच्या, कंपनीच्या बस, दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावर अडकून पडतात. मानपाडा रस्तावर वाहतूक कोंडीने चक्का जाम होत असल्याने बहुतांशी वाहने टिळक चौकातून घरडा सर्कलमार्गे शहराबाहेर जात असतात. घरडा सर्कल विभागातील मॉल आकर्षणाने हा विभाग अधिक गर्दीचे ठिकाण होत आहे. अशा परिस्थितीत घरडा चौकात असणाऱ्या अवाढव्य घरडा सर्कलमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. संबंधित सर्कलची रुंदी कमी करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी महापालिका प्रशासनास केली. परंतु पूरक काम न करणे हा प्रशासनाचा बाणा असल्याने काळण यांच्या लेखी निवेदनाला कचऱ्याची जागा दाखविण्यात आल्याचे काळण जाहीरपणे सांगत आहेत. विशेष म्हणजे हा विषय महासभेत लाऊन धरूनही त्यानंतर याबाबत दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे डोंबिवलीकर वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडले आहेत. टिळक चौक ते घरडा सर्कल रस्ता वाहतूक कोंडीचे आगार ठरत असल्याने वाहन चालकांना स. वा. जोशी शाळा, ठाकुर्लीतील हनुमान मंदिर ते खंबाळपाडा रस्त्याने कल्याणच्या दिशेने मार्ग काढावा लागत आहे. परंतु एकाच वेळी अनेक वाहने ठाकुर्लीत आली तर हनुमान मंदिर भागात वाहतूक कोंडी होते.

याबाबत नगरसेवक विनोद काळण यांनी सुचविलेला पर्याय पालिका प्रशासन का अमलात आणीत नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात या सर्कलच्या डागडुजीची जबाबजारी घरडा कंपनीकडे आहे अशी माहिती समोर येत आहे. असे असूनही सर्कलचे सुशोभिकरण होताना दिसून येत नाही. कचरा, गवत, होल्डिंग मोठ्या प्रमाणावर असल्याचे खूद्द काळण दाखवून देत असतात. वाहतूक कोंडीतून मुक्ती होण्यासाठी सर्कलची लांबी-रुंदी कमी केली तर ही समस्या सुटेल. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि शाळा-कॉलेज मधील विध्यार्थ्यांना सुखकरपणे मार्गक्रमण करता येईल. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नगरसेवक काळण करीत आहेत.