डोंबिवली : हिंदुत्व आणि विकास या दोन गोष्टींसाठी सर्व आटापिटा झाला. सत्तांतर हे या दोन्ही गोष्टी टिकविण्यासाठीच. आपल्या सर्वांना त्याग आणि समर्पण भावनेतून काम करण्याची गरज आहे असे वक्तव्य भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.
भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्हा माध्यमातून आमदार रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा आणि कौतुक सोहळा पूर्वेकडील सावरकर रोड उद्यान, जाणता राजा कार्यालयात आयोजित केला होता त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, अंबरनाथ माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, रेखा चौधरी, जेष्ठ नगरसेवक विकास म्हात्रे, राहुल दामले, नंदकुमार जोशी, नंदू परब, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान चव्हाण यांनी सांगितलं की, हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालतील हे बघणं गरजेचे आहे. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला जबाबदारी देण्याचं काम सातत्याने नेतृत्वाने केलं. झालं काय, झालं कशासाठी याच्यापेक्षा जबाबदारी दिली म्हणून काम करू शकलो. पुढे येणाऱ्या निवडणुका तुम्हा आम्हाला जिंकायच्या आहेत. कार्यकर्त्यांचं पाठबळ राहील म्हणून अनेक गोष्टी करता आल्या. “अकेले देवेंद्र क्या करेंगा” हे सांगणाऱ्यांना कशा पद्धतीने उत्तर दिले हे सांगण्याची गरज नाही. पुन्हा आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कुठेही उन्माद करायचा नाही कारण येणारा काळ कठीण आहे. तारेवरची कसरत आपल्या नेत्यांना करावी लागणार आहे. शत प्रतिशत भाजपा दिशेने उद्दिष्ट घेऊन चालायचं आहे त्यासाठी त्याग आणि समर्पण या गोष्टी आवश्यक आहेत.
सावरकर रोड उद्यान येथील जाणता राजा कार्यालय भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चव्हाण प्रेमींनी खचाखच भरून गेला होता. चव्हाण साहेब आगे बढो हम आपले साथ है, वंदे मातरम, भारत माता की जय, नरेंद्र मोदी झिंदाबाद, देवेंद्र फडणवीस झिंदाबाद अशा घोषणानी परिसर दणाणून गेला. यावेळी, नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे, गुलाबराव करंजुले-पाटील यांनी शुभेच्छापर भाषणे केली.