महिला रिक्षाचालक अधिकृत रिक्षा स्टॅडच्या मागणीला आरटीओचा ठेंगा

डोंबिवली :  रिक्षा चालविण्यात महिला मागे नाहीत. नेहमीप्रमाणे सकाळी घरातील कामे आवरून रिक्षाची किक मारली कि सायंकाळी घरी परतणे हे दैनदिन जीवन जगणे महिला रिक्षाचालकांना चांगलेच जमले आहे. पण स्वतंत्र रिक्षा स्टॅड मिळावा अशी मागणी येथील महिला रिक्षाचालकांनी केली. परंतू या मागणीकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेने लक्ष दिले नाही. मागील दोन महिन्यांपासून अशी मागणी महिला रिक्षाचालक करीत आहेत. पण या मागणीकडे आटीओने ठेंगा दाखवला आहे.

शहरात पूर्व आणि  पश्चिम मिळून एकूण २५ महिला रिक्षाचालक आहेत. या महिला रिक्षाचालक अनेक रिक्षा स्टॅडवर आपली रिक्षा उभी करतात. आपला स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड असावा यासाठी या सर्व महिला रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि  शहर वाहतूक नियंत्रण उपशाखा , डोंबिवलीला कळविले. मात्र याकडे लक्ष दिले नसल्याने महिला रिक्षाचालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ठाकुर्लीत राहणाऱ्या नैना नाईक यांनी सांगितले की, माझे दहावीपर्यत शिक्षण झाले. पतीला संसारात हातभार लावावा याकरता कुरियर कंपनीत काम केले. पण मला वाहन चालविण्याची खूप आवड आहे. मी विचार केला कि आपली आवड हेच आपले करीयर आणि कुटुंबाला हातभार म्हणून रिक्षा चालविण्याचे ठरविले. रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन डोंबिवलीत रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. चार वर्षापासून रिक्षा चालविते. आम्हाला स्वतंत्र अधिकृत रिक्षा स्टॅड द्या अशी मागणी आम्ही केली. मात्र आमच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. शहरात चौकाचौकात, अनधिकृत रिक्षा स्टॅड आहेत त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई झाली नाही. मात्र आम्ही महिला चालक स्वतंत्र महिला स्टॅडची मागणी करीत आहोत याकडे दुर्लक्ष होत आहे.

याबाबत पाम प्रवासी मंचचे सचिन साळवी सांगतात, स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या महिला रिक्षाचालकांना प्रशासनाने पाठिंबा द्यायला हवा होता. पण उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती आहे. आता आम्हीही या महिला रिक्षाचालकांच्या मागणीसाठी पाठपुरावा करू

तर MH05 वाहतूक संघटनेच्या वंदना सोनावणे म्हणाल्या, महिला रिक्षाचालक स्वतंत्र रिक्षा स्टॅडची मागणी करत असतील तर परवानगी का दिली जात नाही ? या मागणीसाठी  MH05 वाहतूक संघटना प्रशासनाकडे पाठपुरावा करेल.

याबाबत कल्याण आरटीओ विनोद साळवी यांनी सांगितले कि, आमच्या माहितीनुसार अर्ज आला नाही, पण पुन्हा चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, कोणालाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाणार नाही