हिरवीगार झाडे झाली अचानक जीर्ण : जुन्या मोठया वृक्षांवर घातक विषारी केमिकल प्रयोगाचा संशय

डोंबिवली, दि. २५ (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून “झाडे लावा, झाडे जगवा” ही मोहीम कल्याण डोंबिवली महानगर पालिका परक्षेत्रात जोमाने सुरू आहे. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक वृक्षारोपण करून नवीन लागवाडीबरोबर जुनी झाडेही जगवत आहेत. परंतु असे असूनही डोंबिवली औद्योगिक विभागातील पेंढरकर महाविद्यालया समोरील एका सरळ रेषेत असणारी काही झाडे अचानक जीर्ण होऊन नेस्तनाबूत होत आहेत. अशा अचानक ओढवणाऱ्या स्थितीमुळे संशयाची पाल चुकचुकत असून त्याकडे जागरूक नागरिकाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

डोंबिबली वेलफर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी पालिका “ई” प्रभागक्षेत्र अधिकारी यांना पत्र पाठवून या घटनेबाबत सूचित केले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की पेंढरकर महाविद्यालयाजवळील पाच मोठी झाडे सुकून जीर्ण झाली आहेत. ही झाडे अचानक जीर्ण कशी झाली. ही जीर्ण झाडे कधीही कोसळून अपघात होऊ शकतो. ही झाडे रहदारीच्या रस्त्यावर असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे जाणे-येणे सुरू असते. त्यामुळे केव्हाही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. परंतु असे असले तरी येथील फक्त ही पाचच झाडे कशी काय जीर्ण झाली हे एक कोडेच आहे. येथील पर्यावरण मित्र व नागरिक यांना याबाबत संशय असून याची चौकशी करणे गरजेचे आहे. सदर जीर्ण झाडांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवून याचा योग्य तो छडा लावावा. जर यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यास कठोर शासन करावी अशी मागणीही नलावडे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या पत्राची प्रत त्यांनी महापौर, उद्यान अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कार्यकारी अभियंता एमआयडीसी आदींना पोच केली आहे.
मुख्य म्हणजे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबण्यासाठी नुकतीच एक लाख वृक्षारोपण करून नवीन जंगल प्रक्रियेची घोषणा केली. पण अशा प्रकारची झाडे निकामी करण्याची प्रवृत्ती उदयास येत असून या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहिले जाते याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे. शहरात विकासाच्या नावावर मोठी वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी येत असू पालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.