डोंबिवली, दि. ०४ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाबाबत नेहमीच ओरड असते. मात्र परिवहनच्या नव्या धोरणामुळे नवीन मार्गांची आखणी करण्याचे काम सूर झाले आहे. कल्याण, डोंबिवली तसेच ग्रामीण विभागात परीवहन सेवा प्रत्यक्ष सूर झाल्याने आता काही प्रमाणात प्रवाशांची सोय झाली आहे. या नव्या बदलामुळे परिवहन उपक्रमाच्या महसुलातही वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
परिवहन उपक्रम अंतर्गत एकुल २१८ बसेस आहेत. यामधून सुमारे ८५ बसेस प्रतिदिन धावत असून काही बसेस रोटेशन पद्धतीने सेवेत आहेत. कल्याण विभागात ६५ तर डोंबिवली विभागात २५ बसेस धावतात. परिवहन उपक्रमातील काही मार्ग फायद्यात तर काही मार्ग तोट्यात चालत असल्यामुळे परिवहनच्या महसुलाचा विचार केला तर चाळीस रुपये प्रती किलोमीटरचे दोन रुट, तीस रुपये प्रती किलोमीटरचे सात रुट, वीस रुपये प्रती किलोमीटरचे सोळा रुट तर दहा रुपये प्रती किलोमीटरचे पाच रुट आहेत. अशाप्रकारे परिवहन सेवेला सुमारे प्रतिदिन सहा लाखांचा महसूल मिळतो. परंतु हा मिळणारा महसूल फारच कमी असल्याने त्यामध्ये वाढ होण्यासाठी विद्यमान सभापती संजय पावशे विविध योजना आखत आहेत.
विविध संस्थांनी आणि रिक्षा प्रवासाला कंटाळलेल्या प्रवाशांनी पालिकेची परीवहन सेवा सुरु व्हावी म्हणून लेखी निवेदनही दिली होती. या सर्व बाबींचा विचार करून डोंबिवलीत मॉडेल कॉलेज, समांतर रस्ता, लोढा वसाहत, निळजे रेल्वे स्टेशन, ग्रामीण विभागात आता बसेस धावत आहेत. या नव्या मार्गामुळे परिवहनच्या तिजोरीत भर पडणार असून त्याचा परिणाम म्हणून महसुलात वाढ होणार आहे.