ऐन पावसाळ्यात पिण्याचा पाण्यासाठी आंदोलन : पालिकेच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असून कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या त्या २७ गावांची पाण्याची तहान कोरडीच आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामीण विभागातील नागरिक त्रस्त आहेत. आम्हाला पाणी द्या या मागणीसाठी “रिपब्लिकन सेना” तर्फे एक दिवस साखळी उपोषण केले. पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता विजय पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना पिण्यास पाणी दिले आणि उपोषण मागे घेतले.

रिपब्लिकन सेना डोंबिवली शहर अध्यक्ष आनंद नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडील इंदिरा चौकट एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष संभाजी साबणे, विभाग प्रमुख अनंत पारदुले, महिला पदाधिकारी गोगलताई मंगे, रोहिणी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपोषणास बसले होते.

नांदिवली पंचानंद येथील मुख्य पाईप लाईन चेक करून त्यावरील अनधिकृत जोडणी त्वरित काढावी, प्रभाग क्रमांक ११२, ११३, ११५ विभागात मोठ्या व्यासाची पाईप लाईन टाकावी, गांधीनगर टॅपिंग १०० मी.मी. आहे ते वाढवुन २५० मी.मी. करणे. नांदिवली पंचानंद येथे ३ इंचाची पाईप लाईन आहे ती वाढवुन ६ इंचाची करणे, नांदिवली पंचानंद येथील वॉलमॅन काम बरोबर करीत नसल्याने त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या अशा महत्वाच्या मागणीसाठी “रिपब्लिकन सेना” तर्फे उपोषण केले होते. उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेण्यासाठी पालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी भेट घेतली. अखेर सर्वांच्या आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे घेतल्याचे नवसागरे यांनी सांगितले. परंतु या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आम्ही आमरण उपोषण करू असेही उपस्थित अधिकाऱ्यानां चोख सांगितले.