डोंबिवली : केरळमधून येऊन महाराष्ट्रात वास्तव्य करीत असताना ख्रिश्चन वगळता अन्य समाजातील तब्बल 400 गरीब कुटूंबाना घर देणे ही अभिमानास्पद बाब आहे. सामाजिक कल्याणाचा वसा घेतलेल्या थॉमस चर्चने गरीबांना घर देण्याचा कार्यक्रम जिल्ह्याच्या अन्य भागातही राबवावा असे आवाहन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
ख्रिश्चन समाजाच्या कल्याण येथील गणेश घाटनजीकच्या चर्चला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खासदार कपिल पाटील बोलत होते. या वेळी बिशप थॉमस इलेव्हनल, इमॅन्यूअल काडनकावील, चर्चचे उपाध्यक्ष राजीव थॉमस, चॅन्सलर जस्टीन कल्लेली, जेकब पोरत्तूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी चर्चने बांधलेल्या 400 घरांच्या चाव्या कुटुंबांना प्रदान करण्यात आल्या.
कल्याणमध्ये 30 वर्षांपूर्वी केरळमधून आलेल्या ख्रिश्चन बांधवांनी कमिटीची स्थापना केली. त्यानंतर इमानदारी व मेहनतीच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून गरीबांना औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या. गरीबांची घरांची तळमळ लक्षात घेऊन ख्रिश्चन समाजवगळता सर्वधर्मातील गरजू 400 कुटूंबांना घरे बांधून दिली. चर्चने आतापर्यंत तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि अंबरनाथमध्ये केवळ 30 वर्षांत घरे देण्यापर्यंत चर्चच्या कमिटीने मारलेली मजल कौतूकास्पद आहे. या समाजाने कल्याण-डोंबिवलीबरोबरच आणखी काही ठिकाणीही घरे बांधण्याचा उपक्रम हाती घ्यावा, असे आवाहन खासदार पाटील यांनी केली. केरळमध्ये 100 टक्के साक्षरता असून, केरळी समाजाने जगभरात प्रामाणिकपणा व मेहनतीने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
प्रत्येक भारतीय माणसाने जात व धर्माचा अभिमान बाळगावा. मात्र, समाजात एक हिंदूस्थानी म्हणून राहावे, असे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे मत होते. त्यानुसारच केरळी ख्रिश्चन समाजाकडून सर्वधर्मसमभावाचे काम केले जात आहे.