महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात होतोय हलगर्जीपणा [ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डोळेझाक ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचा खेळखंडोबा नेहमीच सुरु असतो. रुग्णांना दिली जाणारी सापत्न वागणूक आणि त्यामुळे होणारा त्रास ही नित्याचीच बोंब आहे. याचा फटका झोपडपट्टित राहणाऱ्या एका गरीब महिलेला चांगलाच बसला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्यामुळे बहुजन समाज पार्टीने या महिलेला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच  फैलावर घेतले.

पिसवली रोडला असलेल्या एका झोपडपट्टित राहणारी आशा प्रताप ही ४५ वर्षीय महिला 6 एप्रिल रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेली. तिच्या पोटात दोन महिन्याचा गर्भ होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून गर्भाशयाची पिशवी साफ केल्यानंतर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर तिला काही दिवसांनी तिला रक्तस्त्रावाने त्रास होऊ लागला. त्यामुळे ती पुन्हा 13 एप्रिल रोजी पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी उपचार करून पुन्हा सोडून दिले. मात्र 9 मे रोजी प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागल्याने गराच्या मंडळींनी पुन्हा तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तपासणी दरम्यान स्टोनोग्राफी केल्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीत कशी अंश राहिल्याचे आढळून आले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकानी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

गुरूवारी सकाळी या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करून गर्भाषयाची पिशवी साफ करण्यात आली. 6 एप्रिल ते 10 मे दरम्यान या महिलेला केवळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड यातना भोगाव्या लागल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्याकडे तिच्या नातेवाइकांनी केली. त्यामुळे किरतकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.

यावेळी उपस्थित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी आपण नुकताच चार्ज घेतला असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले. तर स्त्रीरोगतज्ञ डॉ. सीमा आरावकर म्हणाल्या कि, अशी शंभरातून अशी एखादी घटना घडते. सध्या या महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्ही गरीब-कष्टकरी आहोत खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही म्हणून आम्हाला अतिशय वाईट वागणूक रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्याचे त्या महिलेचे नातेवाईक सांगत होते.