डोंबिवली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पूर्वेकडील गांधी बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, कल्याण डोंबिवली महापालिका ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, स्थायी समिती सभापती तथा भाजपा पदाधिकारी राहुल दामले, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, नंदू परब, शिवाजी आव्हाड, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला दुसाने, स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक, इतिहास संकलन समिती व राष्ट्र पुरुष स्मृति जागरण समितीचे चंदू जोशी यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी पूर्व-पश्चिम शहर आणि ग्रामीण विभागातील भाजपचे संपूर्ण नगरसेवक – नगरसेविका, पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संखेने पदयात्रेत सहभागी झाली होते.
यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, महात्मा गांधीनी आपल्या जीवनयात्रेत समाजासाठी केलेले सेवा कार्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जो स्वच्छतेचा संदेश त्यावेळी गांधीजींनी देशाला दिला होता तो स्वच्छतेचा संदेश घेऊन पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मिशनच्या नावाने जनतेमध्ये जनजागृती करून देश त्या दिशेने कसा जाईल या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करतांना दिसत आहेत. यासाठी गावांमध्ये, महानगरपालिकांमध्ये स्पर्धांचं आयोजन करणं, सामाजिक संस्थांना या विषयी आवाहन करणं, वेगवेगळ्या भागांमध्ये स्वच्छता दूत निर्माण करणं अशा पद्धतीने आज देशाला वेगळ्या दिशेला नेण्याचं काम पंतप्रधान मोदीनी केले आहे. हा संपूर्ण पंधरावढा महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आपण सर्वांनी काढायची आहे. शहरात गेली अनेक वर्षे इतिहास संकलन समिती, राष्ट्र पुरुष स्मृति जागरण समिती माध्यमातून सर्व ठिकाणी असणाऱ्या पुतळ्यानां माल्यार्पण करून एखादा वक्ता त्या ठिकाणी त्या राष्ट्रपुरुषांनी देशासाठी काय केलं, त्याचं जीवन आणि त्यांच्या जीवनामधील असणाऱ्या अनेक समाजकार्याच्या घटना लोकांपर्यत पोह्चाविण्याच काम केलं जात आहे. हे कार्य होत असतांना महापालिका प्रशासन त्यांच्याबरोबर कार्य करीत आहे. शहरातील संपूर्ण रस्त्यांवर ज्या-ज्या ठिकाणी आपल्याला कचरा दिसेल त्या सर्व ठिकाणचा कचरा आपण सर्वांनी महापालिकेने केलेल्या व्यवस्थेतुन स्वच्छ करायचा आहे. प्रत्येक प्रभागात पदयात्रेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात रोज सकाळी नियोजनबद्ध पदयात्रा व स्वच्छता मोहीम संवाद यात्रेच्या माध्यमातून महात्मा गांधीनी जो विचार आपल्यासमोर ठेवला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यत न्यायचा आहे असे सांगितले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9:30 वाजता डोंबिवली पश्चिमेतील पु. भा. भावे सभागृहासमोरील महात्मा गांधी उद्यानापासून प्रारंभ झालेली स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा ‘मनी असावी नम्रता अंगी असावी स्वच्छता’ असे फलक घेवून ‘भारत माता की जय, वंदे मातरम, मोदीजी का एकही सपना, स्वच्छ भारत हो अपना’ अशा घोषणा देत हजारो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा भागाशाळा मैदान मार्गे सुभाष रोड, महात्मा फुले रोड, गोपीचौक मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता, डोंबिवली रेल्वे स्टेशन, पंडित दीनदयाळ रस्ता मार्गे मार्गक्रमण करीत हॉटेल साम्राट चौकातील नाना शंकरशेठ मार्गावरील रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयानंतर पदयात्रेचा समारोप झाला.