डोंबिवली : पूर्वी औद्योगिक विभागात असणाऱ्या दोन सांडपाणी प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे विघटन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. परंतु आता सांडपाणी प्रकल्प अत्याधुनिक प्रणालीने परिपूर्ण झाला आहे. जरी आता 25 टक्केच सांडपाणी पाण्यावर प्रक्रिया करण्याची परवानागी मिळाली असली तरी भविष्यात 50 टक्क्यांपेक्षाही जास्त सांडपाणी या केंद्रातून नियंत्रित केले जाईल असे प्रतिपादन प्रकल्प केंद्राच्या प्रमुख पल्लवी फौजदार यांनी केले.
औद्योगिक विभागातील अत्याधुनिक सांडपाणी प्रकल्प केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमात फौजदार बोलत होत्या. यावेळी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोशिएशन [ कामा ] संस्थेचे अध्यक्ष मुरली अय्यर, सचिव देवेन सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
फौजदर पुढे म्हणाल्या, या प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून दोन उत्पादने घेता येतात. एक म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारे स्वच्छ पाणी आणि यामधून उरलेला गाळ. स्वच्छ पाणी बाग-बगिच्या किंवा कोणत्याही कंपनीला बाहेरच्या वापरासाठी लागणारे पाणी पुनर्वापर करता येईल. आणि जो गाळ असेल त्यामध्ये काही इतर साहित्य टाकले तर विटा निर्मिती करता येईल. पण होणाऱ्या विटांच्या निर्मिती वापर फक्त कंपाऊंडसाठी करता येईल. तर यावेळी धनंजय पाटील म्हणाले, विविध कारखान्यातील सांडपाणी वेगवेगळ्या प्रक्रिया सयंत्राद्वारे शुद्ध केले जात आहे. शेवटच्या टप्प्यात प्रदूषण मंडळाने घालून दिलेल्या मानकांचे पालन करण्यास हा प्रकल्प सक्षम झाला आहे.
कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोशिएशन [ कामा ] संस्थेचे औद्योगिक विभागात सुमारे 375 कंपन्या सदस्य आहेत. डोंबिवली शहराचा विचार केला तर 130 रासायनिक 40 टेक्सटाईल्स आणि काही इंजिनिअरिंग उद्योग समूहांच्या कंपन्या आहेत. डोंबिवलीत औद्योगिक विभागातील या कंपन्याचे प्रदूषित पाणी सांडपाणी प्रकल्पात सोडले जाते.
प्रदूषण मंडळाने घालून देलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन होत असून औद्योगिक विभागातील आठ एकरच्या विस्तीर्ण जागेत प्रतिदिन 16 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते अशी माहिती सचिव देवेन सोनी यांनी दिली.