डोंबिवली : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांकरिता लिहिलेल्या कविता अजरामर झाल्या असून आजही बहिणाबाईंच्या कविता कष्टकरी, पिडीत, सर्वसामान्यांना जगण्याकरिता बळ देणाऱ्या असून त्यांच्या कवितांमधून आजही जगताना नवी ऊर्जा मिळते असे गौरवोद्गार ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून सुशोभित करण्यात आलेल्या सुनीलनगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, युवासेना जिल्हाअधिकारी दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले कि, या वर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले व आता डोंबिवलीत बहिणाबाई चौधरी उद्यान सुशोभित करण्यात आले हा एक योग आहे.
आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून सुशोभित करण्यात आलेल्या या उद्यानांत कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. उद्यानात मध्यवर्ती ठिकाणी गोलाकार शिल्प उभारले असून त्यातून आकाशाला गवसणी घालणारी महिलांची झालेली प्रगती दाखविण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण उद्यानात रंगीत दिवे, बहिणाबाईंच्या कवितांची रंगीत भिंत रेखाटण्यात आली आहे व या कविता वाचता याव्यात या करीता एक प्रकारची गॅलरी साकारण्यात आली आहे. तसेच लहान मुलांकरीता खेळणी तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालण्याकरिता फुटपाथ तसेच आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर उद्यानाच्या उद्घाटना प्रसंगी शहरप्रमुख राजेश मोरे, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, मा. जि. प सदस्य प्रकाश म्हात्रे, स्थानिक नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, प्रमिला मुकेश पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील, रवी म्हात्रे, युवासेना तालुका अधिकारी योगेश म्हात्रे, सुमित सुभाष भोईर, विभागप्रमुख सुखदेव पाटील, नेताजी पाटील उपस्थित होते.