कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून  शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीकडून निवडून आलेल्या आमदार राजेश मोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची  रविवारी दुपारी बारा वाजून 23 मिनिटांनी शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मोरे यांनी ईश्वर साक्ष शपथ घेत असे म्हणून शपथ घेतली. हाती घेत असलेले कार्य कर्तव्य निष्ठापूर्वक पार पडेन असेही शपथ घेतना सांगितले.

फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी काही विधानसभा सदस्यांना शपथ देण्यात आल्यानंतर उर्वरित विधानसभा सदस्यांना रविवारी सकाळपासून शपथ देण्यात आली. दुपारी 12 वाजता कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांनी मी राजेश वाळुबाई राजेश गोवर्धन मोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन म्हणत शपथ घेतली. मोरे यांनी शपथ घेण्यापूर्वी छ्त्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आपल्या आई वडिलांना वंदन करताना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने कल्याण ग्रामीण मतदार संघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्याचे सांगत त्यांनी शपथविधी पूर्ण केला.

यानंतर पत्रकारांनी मोरे यांना आपण दोन बलाढ्य उमेदवारांचा पराभव करून विधानभवनात आलात आपणांस कसे वाटते अशी विचारणा केली असता मोरे म्हणाले, खूप आनंद होत आहे. लोकांनी काम करणाऱ्या त्यांच्या लाडक्या लोकप्रतिनिधीला विधानसभा सभागृहात पाठविले आहे. त्यांच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्वीचा महानगरपालिका सभागृहातील काही अनुभव गाठीशी असला तरी आता आमदार म्हणून मोठी जबाबदारी आली आहे. लोकांची जास्त मागणी नसते पण ज्या खऱ्या गोष्टींची गरज आहे त्या ताबडतोब कशा देता येतील याचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावणार. कल्याण ग्रामीण मध्ये मुख्य प्रश्न पाण्याचा आहे त्यादृष्टीने कामे सुरूही आहेत पण ती लवकरात लवकर कशी होतील याकडे प्रथम लक्ष देणार. विधानसभेत लोकांच्या समस्या मांडताना त्या अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पहिल्यापासून कार्यकर्ता असल्याने पुढेही त्याच मार्गाने कामे करतांना आनंद वाटेल. लोकांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने काम करण्याचा उत्साह वाढेल असे सांगून सर्वांनी मला मदतीचा हात द्यावा असे सांगत त्यांच्यातील कार्यकर्ता पुन्हा जागा झाला.