पालिका प्रशासनाचा निषेध :

पालिका प्रशासनाचा निषेध :

फेरिवाल्यांच्या मुक्तीसाठी डोंबिवलीकरांनी केली मानवी साखळी

डोंबिवली, दि. १९ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका फेरिवाल्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून दिवसेंदिवस हा प्रश्न जटील होत आहे. येथील सामान्य नसगरिकांसकट लोकप्रतिनिच्या सहनशक्तीचा अंत झाला. अखेर काल डोंबिवलीकरांनी मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी भाजपा-शिवसेनेना पदाधिकारी सहभागी होते.

काल संध्याकाळी जवळपास शेकडो नागरिक पूर्वेकडील इंदिरा चौकात एकत्र आले. हातात काळ्या रिबीनद्वारे डोंबिवलीकरांनी लांबलचक साखळी तयार केली. या साखळीत तरूण, वृद्ध, महिलांचा सहभाग होता. यांच्या जोडीला ज्येष्ठ वास्तूरचनाकार राजीव तायशेट्ये, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक विश्वनाथ राणे,  दीपेश म्हात्रे, खुशबू चौधरी, शिवसेना शहर संघटक कविता गावंड, प्रकाश तेलगोटे, अश्विन शहा, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डोंबिवली रेल्वे स्टेशनला चारही बाजूंनी विळखा घातलेल्या फेरिवाल्यांना हुसकावून लावण्याकरिता आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. परंतु शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. सत्ताधारी पक्षांचा प्रशासनावर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याने डोंबिवलीकरांना अखेर अशा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले अशी चर्चा होती. आंदोलकांनी फेरीवाला मुक्तीचे फलकही हातात धरले होते. फुटपाथवर फेरीवाला हटाव, पदपथ मुक्त करा, या मागणीसाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. पालिका प्रशासनाने कारवाईत सातत्य न ठेवल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करणार अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.