पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाली पुरसदृश्य परिस्थिती
डोंबिवली, दि. २० (प्रतिनिधी) : मागील दोन दिवसात कल्याण डोंबिवली शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. डोंबिवली पूर्वेकडील निवासी विभागासहित बाजूच्या गोळवली गावातसुद्धा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे. परंतु या महत्वाच्या दुर्लक्षित समस्येवर तातडीने उपाययोजना केली नाही तर उद्याच्या शुक्रवारी पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा कल्याण जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी दिला आहे.
मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसाने गोळवली परिसरात अनेक ठिकाणी पाणी भरले होते. परिणामी शाळेतीळ विद्यार्थांना गुडघाभर पाण्यातून चालावे लागले. महापालिका प्रशासनाला पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना तसेस आमच्या गोळीवली गावांच्या समस्या सोडविण्यात इच्छा नसेल आणि गावांचा भार पेलवत नसेल तर महानगरपालिकेतून ही गावे वगळावी असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हाअध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले आहे. मागील वर्षी पावसाच्याच पाण्यात एक मुलगी वाहून गेली होती. तिचा अद्यापपर्यंत काहीच पत्ता नाही. पुन्हा अशी घटना घडली तर त्याला जबाबदार पालिका असेल अशी पुष्टी पाटील यांनी पुढे जोडली. पालिका प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी उद्या गोळीवली भागात मोठ्या संख्येने रास्ता रोको करून आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशाराही सुधीर पाटील यांनी दिला आहे.