डोंबिवली, दि. २६ (प्रतिनिधी) : सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेद्वारे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या कल्याण आणि डोंबिवली स्थानकांचा पुनर्विकास करण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केली. कल्याण स्थानकाचा पुनर्विकास पुढील टप्प्यात करण्याची ग्वाही देतानाच डोंबिवली स्थानकाचा समावेश या यादीत करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. त्याचबरोबर ठाकुर्ली येथे ग्रीनफिल्ड टर्मिनसलाही मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्याचेही काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत लोकसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पुरवणी प्रश्न विचारताना खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण आणि डोंबिवली स्थानकांच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय रेल्वेने देशभरातील ए१ आणि ए श्रेणीतील ४०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना आखली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २३ स्थानकांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगरी मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या पाच स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. मात्र, कल्याणचा एकूण योजनेत समावेश असूनही पहिल्या टप्प्यात कल्याणची निवड करण्यात न आल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले. कल्याण आणि डोंबिवली ही मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. तीन लाख ६० हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रति दिवशी कल्याण स्थानकाचा वापर करतात. प्रति दिवशी दोन लाखांहून अधिक तिकिटे आणि पासेसची विक्री होते. लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी मिळून ५०० हून अधिक गाड्या कल्याण स्थानकात थांबतात. त्यामुळे कल्याण स्थानकाची निवड पहिल्या टप्प्यात होणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करून खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण स्थानकाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे, गेली तीन वर्षे डोंबिवली स्थानक मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीच्या स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दिवसाला तीन लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकाचा वापर करत असून प्रति दिनी अडिच लाखांहून अधिक तिकिटे आणि पासेसची विक्री होते. त्यामुळे या स्थानकाच्याही पुनर्विकासाची गरज असून डोंबिवली स्थानकाचा समावेश पुनर्विकास योजनेत करणार का, असाही प्रश्न खा. डॉ. शिंदे यांनी विचारला.