नांदिवली विभागात पाणी टंचाई : अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे भ्रष्टाचार आणि पाणीटंचाई

डोंबिवली : डोंबिवली जवळच असलेल्या नांदिवली पंचानंद मधील पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे म्हणून जादा क्षमतेचे पंप बसवण्यास मंजूरी असताना ठेकेदार व अधिकाऱ्याच्या घनिष्ट संबंधामुळे असे भ्रष्टाचार होऊन  कमी क्षमतेचे पंप बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिवसैनिकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

नांदिवली पंचानंद प्रभाग (112) पी अॅन्ड टी कॉलनी (113) आणि नांदिवली मिनल पार्क (115) या प्रभागातून शिवसेनेच्या महिला नगरसेविका विजयी झाल्या आहेत. सदर प्रभाग डोंबिवली नजीक असल्याने मोठया प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. मात्र या भागात मोठया प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या भागाला पाणी पुरवठा होण्यासाठी पिंपळेश्वर मंदिराजवळ पाण्याची टाकी बसवण्यात आली असून येथून या प्रभागाला पाणी पुरवठा होतेा. परंतु पाण्याच्या टाकीवर जे पंप बसवण्यात आले आहेत ते ग्रमपंचायत काळातील आहेत. सदर पंपांची क्षमता कमी होती म्हणून 60-70 हॉर्स पॉवर्सचे पंप बसवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही या भागात पाणी टंचाई असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होत आहे. मोठया हॉर्स पॉवर्सचे पंप बसवूनही पाणी टंचाई का हे पहाण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे व स्थानिक नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी पहाणी केली. दरम्यान जादा क्षमतेचे पंप बसवण्याऐवजी 40-50 हॉर्स पॉवर्सचे पंप बसवण्यात आल्याचे दिसून आले.

या प्रकारामुळे प्रकाश म्हात्रे म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी विभागाच्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले. ठेकेदार व अधिकारी यांच्या घनिष्ट संबंधामुळे असे भ्रष्टाचाराचे काम होत असल्याचा आरोपही त्यानी केला. पाण्याच्या समस्येमुळे अखेर जुने पंप दुरूस्त करुन बसवण्यात आल्यानंतर गुरूवारपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे असे म्हात्रे शेवटी म्हणाले.