मानपाडा रस्त्यांवरील खड्ड्याबाबत ग्रामीण डोंबिवलीकर हैराण [ पालिका उपाभियंताना दिले निवेदन ]

डोंबिवली : नेहमीच स्मार्ट सिटीचे आश्वासन देणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. पालिका अंतर्गत असणाऱ्या शहरी ग्रामीण रस्त्यांवर खड्डेच-खड्डे झाले असून नागरिक हैराण झाले आहेत. नेहमी वाहतुकीची कोंडी असणाऱ्या डोंबिवली ग्रामीण विभागातील मानपाडा रोडची परस्थिती अतिशय दयनिय झाली आहे. यामुळे अखेर शिवसेनचे कल्याण तालुका प्रमुख प्रकाश गोविंद म्हात्रे यांनी रस्त्यातील खड्ड्यांची दूरूस्ती करा असे निवेदन देऊन झोपलेल्या प्रशासनाला जागे केले आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. देशातील 100 स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी महानगरपालिका, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मानपाडा रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यामुळे रस्त्यावरून पायी चालणे अवघड झाले आहे. दुचाकी वाहने खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. प्रसंगी चालक व नागरिक जखमी होत आहेत. खड्ड्यात वाहन चालवणे कठीण होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. विद्यार्थ्यांना आणि कामावर जाणाऱ्याना इच्छित स्थळी जाण्यासाठी विलंब होत आहे. येत्या काही दिवसत सण-उत्सवाचे दिवस येत असून त्यापूर्वी रस्त्यांची योग्य दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने याचा विचार करून लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करून हे जीवघेणे खड्डे बुजवावे आणि चांगले रस्ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे.