डोंबिवली : राज्यात सात दिवसच पुरेल एव्हढा रक्तसाठा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्देशित केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही त्यामुळे रक्ताची गरज भासणारच आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आवाहनानुसार चार ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा सुदृढ करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अशाच रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शंभर रक्तदाते खास राखून ठेवले आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी दिली.

पश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर होत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदान रक्तदानाची रिकव्हरी 48 तासात होते याची माहितीही रक्तदात्याला दिली जात आहे. त्यामुळे कोणीही रक्तदानाला घाबरू नका असे सांगितल्याने चांगल्याप्रकारे रक्तदाते सहकार्य करीत आहेत. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद ब्लड बँक शास्त्रीनगर डोंबिवली यांचे सहकार्य मिळाले असून बिजॉय मॅथ्यू, डॉ. चंदन कुमार, वर्षा उरावने, अभिषेक सोनार, सिद्धार्थ जाधव, निखिल पडविल यांचे सहकार्य लाभले. कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कुठेही रक्तदान शिबिर झाले नाही त्यामुळे काही शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा या घोषणाद्वारे शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी शिवसेना विभागप्रमुख मनोज रमेश म्हात्रे, शिवसेना युवा नेतृत्व प्रवीण रमेश म्हात्रे यांनी या शिबिरासाठी पाठपुरावा करून मोठा रक्तसाठा जमा केला आहे.