डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्यात रिक्षाचालक करणार वृक्षारोपण ! ( रस्त्यातील खड्यांमुळे वाहनचालक हैराण )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनावर शहारतील करदाते नागरिक विविध समस्यांनी त्रासले असतानाच आता रस्त्यामधील खड्डयाने यामध्ये अधिक भर पडत आहे. यापूर्वीही रस्त्यातील खड्यांमुळे लोकप्रतिनिधींना उत्तरे देणे कठीण झाले होते. आता प्रशासकीय राजवट असून परिस्थितीत काहीच फरक पडत नसल्याने न्याय कोणाकडे मागायचा असे डोंबिवलीकर विचारत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांसह रिक्षा चालक हैराण झाले असून आता ते रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करीत आहेत. खड्ड्यामुळे रिक्षा चालकांनी सोमवारी डोंबिवली विभागीय “ह” प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा दिला.

पश्चिमकडील रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी खड्डडे भरण्याचे जरी काम सुरू असले तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. पुन्हा त्याच जागेवर मोठे खड्डे पडत आहेत मग ते खड्डे बुजवून काय फायदा असा प्रतिप्रश्न होत आहे. सुभाषरोड, जुनी डोंबिवली रोड, गरिबाचावाडा, राजूनगर, मोठागाव ठाकुर्ली, ठाकूरवाडी,

कुंभारखानपाडा, देवीचापाडा आदी भागात प्रवास कसा करायचा? जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना रस्त्यांवरून मरायला पाठवायचं का असे खाजगीत नागरिक बोलत आहेत. या खड्ड्यांच्या प्रकाराने रिक्षा चालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच रिक्षाचा रिपेरिंग खर्च वाढत असल्याने जगायचं कसं, रिक्षाचे हप्ते भरायचे कसे आणि खायचं काय ? दिवसभर रिक्षा चालवून तो पैसा रिक्षा दुरुस्ती आणि डॉक्टरांवर खर्च करायचा असे प्रश्न सहाय्यक आयुक्तांना रिक्षा चालकांनी विचारले आहेत. आता रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याची परवानगी द्या त्यामुळे पर्यावरणाला मदत होईल अशी टीकाही रिक्षा चालकांनी केली.

रिक्षा चालक मालक युनियन तर्फे मोर्चा ह प्रभागक्षेत्र कार्यालयावर काढण्यात आला होता. यापूर्वी मागील महिन्यात असा मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले होते पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही असे युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी सांगितले. आज मुख्य कार्यकारी या अभियंता सपना कोळी यांनाही याबाबतची माहिती दिली असून आता त्या याकडे लक्ष देतात का ते पाहून पुढे पालिका मुख्यालयावर मोर्चा काढू असे शेवटी जोशी यांनी सांगितले. यावेळी मोर्चात कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, पदाधिकारी भिकाजी झाडे, राजा चव्हाण, विनायक म्हात्रे, विजय गावकर, भगवान मोरजकर, राजेंद्र गुप्ता, ईश्वर कनोजिया, शिवा नाडर, गणेश शिर्के यांच्यासह रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी होते.