( सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन )
डोंबिवली : कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेने औद्योगिक विभागात होणारे अपघात व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी अशी इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची निर्मिती केली आहे. आपाद परिस्थितीत मदत मिळविण्याच्या दृष्टीने असे कंट्रोल सेंटर खूप फायद्याचे ठरेल. परंतु उद्योजकांनी वेळीच फायर ऑडिट आणि प्रदूषणमुक्त विभाग अशी शंभर टक्के काळजी घेतली तर कोणीही कंपन्या हलवा असा विषय समोर आणणार नाही. येथील कंपन्या सर्वांच्या गरजेच्या तसेच बेरोजगारांना अभय देणाऱ्या आहेत. आता औद्योगिक विभागात अपघात टाळण्यासाठी ‘कामा’ संघटनेचे इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची केलेली निर्मिती नक्कीच फायद्याची ठरेल असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तथा कामाच्या व्हॅन उपक्रमाचे उदघाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी कामाचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी, डॉ. कमल कपूर, नारायण माने, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, कामाचे पदाधिकारी, सदस्य व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, औद्योगिक विभागात रासायनिक सांडपाणी प्रदूषण, हवेतील प्रदूषण, कंपनीतील आगी असे विषय सतत चर्चिले जात असतात. यावर देखरेख आणि अपघात रोखण्यासाठी अशा प्रकारच्या उपकरणाचा निश्चित फायदा होईल. परंतु जर सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योगाचे शंभर टक्के फायर ऑडिट करून घेतले तर अपघातच होणार नाहीत. परंतु जरी भविष्यात परिस्थिती उद्भवली तर या कामाच्या नव्या निर्मितीमुळे मोठा फायदा होईल.
तर यावेळी कामा अध्यक्ष डॉ. देवेन सोनी म्हणाले, कामा सेंटरच्या माध्यमातून बनवलेली व्हॅन हि अपघात स्थळी जाऊन आग विझविण्यासाठी मदत करू शकते. या व्हॅन मध्ये आधुनिक पद्धतीचे यंत्रसामुग्री असून तत्परतेनी व्हॅन घटनास्थळी पोहचून मदत करेल. असेच एक सेंटर ठाण्याला आहे पण ठाण्यावरून मदत पोहचे पर्यंत आग लागलेली कंपनीचे खाक होऊन जाईल. दुर्घटना आटोक्यात आणणे महत्वाचे असते. जर ती दुर्घटना हाता बाहेर गेली तर संपूर्ण कंपनी बेचीराग होऊन जाईल. त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली तर या सेन्टरच्या मदतीने आपण तिला लवकर आटोक्यात आणू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उद्योजकांसाठी अशी व्हॅन वरदान ठरेल.