नेवाळीतील निरपराध

नेवाळीतील निरपराध
शेतकऱ्यांवर अन्याय नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा ग्वाही
कल्याण, दि. 8 (प्रतिनिधी)  नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा दिली. नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नेवाळी येथे झालेल्या आंदोलनानंतर आगरी-कुणबी आणि कोळी समाजामध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेसंदर्भात डोंबिवलीत गुरुवारी समाजबांधवांची बैठक झाली. या बैठकीला समाजातील लोकप्रतिनिधींबरोबरच उच्चपदस्थ व्यक्ती, डॉक्टर, उद्योगपती, अभियंते आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत समाजाच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार खासदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेण्यात आली. या वेळी आमदार गणपत गायकवाड, बाळाराम पाटील, जगन्नाथ पाटील, अनंत तरे यांच्यासह सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भूमिपूत्र असलेल्या आगरी-कुणबी व कोळी समाजाच्या अस्वस्थतेकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. वर्षानुवर्षे कसणाऱ्या जमिनीचा त्याग केल्यानंतरही अद्यापी समाजाला संघर्ष करावा लागतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच नेवाळीबाबत निर्णय होऊन शेतकऱ्यांसह समाजाला दिलासा मिळेल, असे आश्वासन दिले. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याशी संपर्क करून बैठक घेण्यात येणार आहे. त्यात नेवाळीबाबत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकरी आंदोलनातील एकाही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही. ज्यांचा आंदोलनाशी संंबंध नाही, त्यांंच्यावर पोलिसांकडून अन्याय केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्तांचाही दिलासा
नेवाळीतील आंदोलनाबाबत निरपराध व्यक्तींना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले. सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीच्या वतीने पोलीस आयुक्तांचीही आज भेट घेण्यात आली. गावांमधील वातावरण सामान्य स्थितीत आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे, असे आयुक्त परमबीरसिंग यांनी सांगितले.