डोंबिवली. दि. ३१ (प्रतिनिधी) : या देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंदे मातरमचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जातो. वंदे मातरम प्रत्येकाने म्हटले पाहिजे, पण जर एखाद्याने वंदे मातरम नाही म्हटलं तर काय बिघडणार आहे ? असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात विचारला.
डोंबिवली पश्चिमेकडील जोंधळे सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा ११वा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सध्या गाजत असलेल्या `वंदे मातरम` या विषयावर आपले मत मांडले. पत्रकारांना घरे मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे असे म्हणताना आठवले यांनी पत्रकारावरहि कविता वाचली.
“मोदी आहेत म्हणून मी आहे आणि मी असल्यामुळे म्हणून मोदी” असे म्हणताच सभागृहात हास्याचा पाऊस पडला. त्यानंतर ते म्हणले उत्तर प्रदेशात मायावतींनी कितीही प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. तेव्हा त्यांनी आता आमच्या बरोबर यावे.
यावेळी अनेक पत्रकारांना पत्रकार भूषण पुरस्कार आणि डोंबिवलीतील माणिक उघडे आणि राहुल क्षीरसागर यांना समाजभूषण पुरस्कार, भिवंडीचे कै. नारायण तरे यांना मरणोत्तर जीवनगौरव, कामगार नेते अभिजित राणे यांना कामगार श्री पुरस्कार, आरपीडीचे शेतकरी अंकुश सावळकर यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपा आमदार नरेंद्र पवार, शिवाजी आव्हाड, सागर जोंधळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवडकर, प्रमुख कार्यवाह मनीष रणशूर, संयुक्त कार्यवाहक शंकरराव रहाणे, उपाध्यक्ष संतोष धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
दयानंद किरतकर [बहुजन समाज पक्ष – प्रदेश सचिव]
आमचा बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल. आठवल्याना अजून मान्यता नाही निशाणीही नाही. उलट त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय ताकत वाढवायला पाहिजे. त्याना माहित नसेल कि नदी समुद्राला मिळते समुद्र नदीकडे जात नाही. आम्हाला कॉंग्रेस-बीजेपी सारखेच आहेत. हे दोन्ही पक्ष एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आमची दोघांशी लढाई आहे आणि अशा लोकांबरोबर आठवले गेले आहेत त्यांचा सोबत आम्ही कसं जाणार.