डोंबिवली : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेमार्फत महापालिका क्षेत्रात आज व्यापक प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या प्रभागक्षेत्रातील महत्वाच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. सदर मोहिमेचा शुभारंभ शिवाजी चौकापासून करुन पुढे पत्रीपुलापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त धनाजी तोरस्कर, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, मिलींद धाट, उप आयुक्त नितीन नार्वेकर यांनी शहर स्वच्छतेमध्ये आपला सहभाग नोंदविला. यावेळी मनपा कर्मचा-यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देवून नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन देण्याबाबत आवाहन केले. ओला व सुका कचरा वेगळा करुन महापालिका घंटागाडयांमध्ये टाकण्याचे नागरिकांनी यावेळी सुचित केले.
महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी यावेळी सांगितले की, महापालिका स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. ‘स्वच्छता’ हा नागरिकांच्या दृष्टिने महत्वाचा भाग असल्याने महापालिका याकरिता नियोजनबध्द कार्यक्रम आखत आहे. नागरिकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.
घरातल्या घरात कच-याची विल्हेवाट करुन तो कमीत कमी निर्माण होईल यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेत महापालिकेचे क प्रभागक्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी, ब प्रभागक्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले, ई प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखडे, आय प्रभागक्षेत्र अधिकारी शरद पाटील व कर्मचारी, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी व सफाई कमर्चारी यांनी झाडू, फावडे व थैल्या घेवून स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून ही मोहिम यशस्वी केली.