खासदारांच्या पत्राला थारा नाही : जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी विभागातील नागरिक पाण्यापासून वंचित
डोंबिवली : पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा पाऊस होऊनही कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिक्षेत्रातील डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडीतील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. पाणी वितरण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. विशेष म्हणजे याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या विषयी आयुक्तांना पत्र देवूनही त्या पत्राला केराची टोपली दाखविली जात आहे. अजून पाण्यासाठी किती खेटे घालायचे अशी विचारणा येथील तहानलेले नागरिक करीत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 54 ठाकूरवाडी मधील अरुण निवास परिसर आणि गिरीजामाता विभागातील इमारतींना गेले दीड ते दोन महिने अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबात जागरूक नागरिक धनाजी चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पालिकेस पत्रव्यवहार केला होता. ‘ह’ प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी या विषयी पाहणी करूनही समस्येवर दुर्लक्ष केले असा आरोप होत आहे. या विभागात असणाऱ्या जलवाहिन्या सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वीच्या असून त्या घाणीने तुंबल्या असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्य म्हणजे त्या जलवाहिन्या 5 ते 6 फुट खोल असुन पाण्याचा विसर्गही होत नाही. त्यामुळे ही जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संगीता मुकेश पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन सदर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्तांना पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पत्रही दिले परंतु अद्याप त्याचा काहीच परिणाम होत नाही. यामुळे आता आम्हाला कोण न्याय देणार अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत.
याबाबत महापौर विनिता राणे यांच्याची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, नेमकी काय बाजू आहे याची दखल घेऊन मार्ग निश्चित काढला जाईल. परंतु काही वेळा प्रशासकीय कामाची माहिती नसल्याने समस्या निर्माण होत असली तरी नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही.