प्रकाश आंबेडकर मायावतींशी चर्चा करायला तयार असतील तर आम्ही चर्चा करु — सुरेश साखरे
डोंबिवली : वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीपासून एकटा चालण्याची भूमिका घेत आहे. त्यांनी आमच्या बरोबर चर्चेची दखलही घेतली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांचे मत विभाजन टाळायचे असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, आंबेडकरी विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र यायला हवे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आहेत. आंबेडकरी विचारसरणीच्या मतांचे विभाजन टाळायचे असेल तर त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घ्यावी आणि युती करावी. पण त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी प्रथम मायावतींशी चर्चा केली तर त्यानंतर आम्ही करू असे वक्तव्य बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी डोंबिवलीत केले.
बसपा तर्फे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती येथील ठाकूर हॉलमध्ये मंगळवारी आयोजित केली होती त्यावेळी सुरेश साखरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बसपाचे महाराष्ट्र प्रभारी राम अचल राजभर, अध्यक्ष सुरेश साखरे, महासचिव प्रशांत इंगळे, महासचिव दयानंद किरतकर, ठाणे प्रभारी आलमभाई शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष शोभाताई इंगळे, कल्याण लोकसभा अध्यक्ष विनोद भालेराव, डोंबिवली शहर अध्यक्ष दामोदर काकडे आदी उपस्थित होते.
साखरे पुढे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने आंबेडकरी चळवळीला मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या शाहिरी मुळे चळवळीचा अंगार तळागाळातील कष्टकरी जनतेपर्यंत पोहचला आहे.
यावेळी राम अचल राजभर यांनी बसपाच्या आगामी वाटचालीबाबत माहिती देतांना सांगितले, बसपा महाराष्ट्रात सर्व विधानसभा जागा लढविणार असून सर्व जिल्ह्यात संघटना बांधणीचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे कार्य सुरु आहे. त्यामुळे बसपा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश संपादन करेल असा विश्वास राजभर यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामोदर काकडे, वैभव पटणे, सुनिल चव्हाण, बाबासाहेब काळे, मनोज किरतकर, रविकिरण बनसोडे, रवी बागूल, महेंद्र जाधव, प्रितम वाघमारे यांनी विशेष मेहनत घेतली.