डोंबिवली : शहरातील रस्ते आणि खड्डे यांचे नाते कधी संपणार की आम्हाला संपविणार असे प्रश्न विचारत डोंबिवलीत रिक्षा चालकांनी कडोंमपा ह प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केले.
शहरात माजी महापौर पुंडलिक म्हात्रे अध्यक्ष असलेल्या चालक-मालक रिक्षा संघटनेने गुरुवारी डोंबिवली पश्चिम दोन पाणी टाकी जवळील पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र कार्यालयावर रिक्षा चालकांनी मोर्चा काढून धडक दिली. किती निवेदने द्यायची यांच्या लाजा आता संपल्या आहेत. आमचे कंबरडे मोडून आम्ही संपलो तरी या डोंबिवलीतील रस्त्यांतील खड्डे भरले जाणार नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांना फक्त आंदोलनाची भाषा समजते म्हणून आंदोलन करतो असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

चालक-मालक रिक्षा संघटनेने पदाधिकारी शेखर जोशी, अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, ईश्वर कानोजिया, अरुण कोचरेकर यांच्यासह शेकडो रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते. कंबरडे मोडले तरी कडोंमपाला जाग नाही, आंदोलन प्रवाश्यांसाठी व नागरिकांसाठी, वृद्धांना खड्ड्यांच्या त्रास होतो, ऑपरेशन झालेले रुग्ण, नागरिक यांनाही खड्फ्याचा त्रास होतो. रिक्षा चालकांना रिक्षा स्टँड नाही तर चांगले रस्ते तरी द्या, खड्ड्यांतून जाणाऱ्या प्रवाश्यांनी जागरूक व्हा असे फलक रिक्षा चालकांनी आंदोलन झळकावले.
याबाबत उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले, गेले चार-पाच दिवस पावसाने उघडीप घेतली तरी डांबरीकरण पद्धतीने खड्डे बुजविले जात नाहीत. खड्ड्यात फक्त दगड-माती टाकून ते बुजविण्याचे काम चालले आहे. या कामामुळे त्याचठिकाणी पुन्हा मोठे खड्डे होतात मग अशा खड्डे बुजविणे काय कामाचे. अधिकाऱ्यांना आता लाज नाही, पश्चिम डोंबिवलीत सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. डांबरीकरण पूर्णपणे बंद आहे. आता पालिकाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी आजचे आंदोलन पाहिले जर डांबरीकरणाने खड्डे बुजविले नाही तर शनिवारी-रविवारी रिक्षा बंद ठेवणार असा इशारा दिला.