नागरिकांच्या इच्छाशक्तीशिवाय शहर कचारामुक्त होणार नाही — रमेश म्हात्रे

नागरिकांच्या इच्छाशक्तीशिवाय शहर कचारामुक्त होणार नाही
— रमेश म्हात्रे
डोंबिवली, दि. ९ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात होणाऱ्या कचऱ्यामुळे कल्याण-डोंबिवली जुळ्या शहरांच्या नावलौकिकाचा खूप बोजवारा वाजला. यावर मात म्हणून कचरा मुक्त प्रभाग झालाच पाहिजे ही संकल्पना पुढे येऊन कचारामुक्तीसाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण योजन राबविण्याचे ठरले आहे. आज गुरुपौर्णिमादिनाचे औचित्य साधून स्थायी समिती सभापती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी “जनजागृती दिंडी” काढून प्रभागातील नागरिकांना कचरा व प्लास्टिक मुक्तीची विनंती केली.
पश्चिमकडील कोपरगांव आणि कोपररोड प्रभागात स्थानिक स्त्री-पुरुष, विद्यार्थी यांनी कचरामुक्तीसाठी “जनजागृती दिंडीत” सहभाग घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण करूया घरच्या घरी, माझा कचरा माझी जबाबदारी असा संकल्प केला. रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत नगरसेविका गुलाब म्हात्रे, परिवहन सभापती संजय पावशे, चरू बामा म्हात्रे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती व स्वच्छतेची शपथ घेतली.  रमेश म्हात्रे यांच्या अभंगाला टाळ-मृदूंगची साथ मिळाल्याने दिंडीला बहर आला.
यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हात्रे म्हणाले, काचारामुक्ती साठी सर्वांची साथ मिळणे गरजेचे आहे. प्रभागाची स्वच्छता राखून आपले आरोग्य चांगले राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि हे सर्वाना समजले पाहिजे म्हणून या दिंडीचे आयोजन आहे. जर ओला-सुका कचरा वेगळा केला तरच शास्त्रीय पद्धतीने पुढील प्रक्रिया करता येतील. यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून शून्य डम्पिंगग्राउंड पालिका हे उद्दिष्ट गाठता येईल. “गाव करी ते राव काय करी” या आपल्या जुन्या म्हणी प्रत्यक्षात साकार झाल्या तर कल्याण-डोंबिवली शहर नक्कीच कचारामुक्त होईल. विशेष म्हणजे पालिका दहा लाख कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात करणार आहे असेही पुढे सांगितले.