आज सार्वत्रिकीकरणामुळे दिसते गुणवान विद्यार्थ्यांची पिढी —- विद्याधर जोशी

डोंबिवली, दि. ०३ (प्रतिनिधी) : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व सुलभीकरण यामुळे आज गुणवान विद्यार्थ्यांची पिढी निर्माण झाली आहे. या गुणवान विद्यार्थ्यांनी आकाशाला कवेत न घेता स्वतः आकाश व्हावे असे गौरवोद्गार वझे केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य विद्याधर जोशी काढले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पूर्व माध्यमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक राहुल दामले, प्रमुख पाहुणे म्हणून  उपप्राचार्य विद्याधर जोशी, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी जोशी पुढे म्हणाले, संस्थेच्या सर्व शाळांचे तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवले आहे. अभ्यासाच्या ओझ्यामुळे नववी पासून बारावी पर्यंत झापडबंद पध्दतीने अभ्यास करू नये.

तर राहुल दामले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कौशल्य विकसित करून विविध क्षेत्रात नाव कमवावे. मातृभाषेतून मिळालेले शिक्षण हे पुढील आयुष्यात समाजाशी बांधिलकीची जाणीव करून देते. गुणवंत विद्यार्थ्यांनी राजकारणात यावे अशी इच्छा व्यक्त केली.

संस्था अध्यक्षा डोंगरे यांनी आश्रमशाळेसह सर्व शाळातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेले संस्कार विसरू नयेत असे म्हटले.

यावेळी संस्थेच्या सर्व शाळातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. भार्गवी शिरीष सरोदे म्हणाली कि, अभ्यासातील सातत्य , विशेष मार्गदर्शन वर्ग, वेळेचे नियोजन, आई वडील व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन उपयोगी पडले.

यावेळी 10वी मधील 21 विद्यार्थी व शिष्यवृत्ती प्राप्त 6 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन गौरांगी जोशी यांनी केले.