डोंबिवली, दि. ०५ (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांकडे नेहमीच डोळे झाक केली जाते. शासनाने कर्ज माफी होणार असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र कल्याण तालुक्यात परिस्थिती वाईट आहे. आमच्याकडे कर्ज माफी बद्दल कोणतेच निर्देश आलेले नाहीत असे अधिकारी सांगत आहेत. येथील शेतकऱ्यांना जर वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ग्रामीण नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आदि प्रांतातील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. या विषयाने संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला. शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून बाहेर काढलेच पाहिजे यासाठी सर्व शक्ती एकत्रित आली. अखेर शासनाने कर्ज मुक्तीचे निर्देश दिले. पण असे असले तरी कल्याण तालुक्यातील या विषयावर संबंधित अधिकारी योग्य माहिती देत नाहीत अशा अनेक तक्रारी वंडार पाटील यांच्याकडे ग्रामीण विभागातील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे वंडार पाटील यांनी या विषयात लक्ष घातले आहे. यावेळी पाटील यांनी अशीही माहित दिली कि, आमच्या येथील शेतकरी फक्त भातच एकच पिक घेतात दुबार पिक घेत नाहीत. त्यामुळे जर कर्ज माफ होणार कि नाही हे कधी कळणार. आणि पुन्हा कर्ज कधी मिळणार अशाप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले.
याबाबत संबंधित अधिकारी देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार आता सर्वच कर्जदार शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहोत. यानंतर शासनाच्या निकषाप्रमाणे पडताळून कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली ते कळेल. ही प्रक्रिया ओंनलाईन असून यासाठी आधारकार्ड जोडणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे हा नियम सगळीकडे सारखाच आहे त्यामुळे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. पण सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी माफीसाठी अर्ज भरून द्यावे असे सांगितले.