कल्याण प्रादेशिक कार्यालय माध्यमातून तीन लाख झाडे लावणार — धनंजय पाटील

डोंबिवली : दिवसेंदिवस विकासाच्या हव्यासामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा कचरा ही मोठी समस्या आहे. यामुळे प्लास्टिक पिशव्याचा वापर बंद करून करून आपले शहर प्लास्टिक मुक्त करू. पर्यावरणाची दखल घेण्यासाठी कल्याण प्रादेशिक कार्यालयाने तीन लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याणचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी केले.

कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित डोंबिवली औद्योगिक विभागातील सांडपाणी प्रकल्प परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळे ते बोलत होते. यावेळी देवेंन सोनी (व्यवस्थापकीय संचालक, डीसीईपीटी), मुरली अय्यर (प्रेसिडेंट, कामा), राजू नलावडे, अमर दुर्गुले, (उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी) आणि डीसीईपीटीचे संचालक उदय वालावलकर, चांगदेव कदम, डॉ. निखील धूत, कमल कपूर इत्यादिसह अनेक कारखानदार, कामगार, नागरिक उपस्थित होते.

यावेळी पाटील पुढे म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जनागृतीही करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे प्लास्टिक स्वरुपात पिशव्या आहेत त्यांनी तीन महिन्याच्या आत त्या बाद करायच्या आहेत. जून – 2018 नंतर जर प्लास्टिक पिशव्या दिसल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे कि प्लास्टिक वापर बंद करून आपले शहर प्लास्टिक मुक्त करू. पाणी, वीज वापरावर नियंत्रण ठेवावे. आपल्या घरापासून प्रथम प्लास्टीक वापर कमी करावे. कापडी पिशव्यांचा वापर करा. मुख्य म्हणजे सौर उर्जेचा वापर करण्याकडे भर दिला पाहिजे. ओला कचरा सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून आपण पर्यावरणासाठी हातभार लाऊ शकतो.

तर यावेळी डीसीईपीटीचे संचालक कमल कपूर म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघ माध्यमातून १९७२ रोजी जागतिक पर्यावरण दिन घोषित करण्यात आला. विकासाच्या नावावर मुख्य नैसर्गिक मुल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाबरोबर आपण भरपूर काही हरवत चाललो आहोत. वीज निर्मिती, जंगल तोडणी, प्लास्टीक निर्मिती आदींमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागे अनेक उद्देश असले तरी मुख्य म्हणजे ज्या काही चुका आपल्या हातून होतात त्या सुधारण्यासाठी या दिवसाकडे पहिले पाहिजे. पुढील पिढीसाठी निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

यावेळी औद्योगिक विभागातील फेज 1 फेज 2 कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी एम.आय.डी.सी. विभागातील डोंबिवली सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र परिसर तसेच आशापुरा गोलमैदान आणि इतर भागात वृक्षारोपण करण्यात आले.