भव्य वास्तूत अभिनव बँकेच्या शाखेचे स्थलांतर [ माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा संपन्न ]

डोंबिवली : शहरातील प्रतिष्ठित बॅंक म्हणून ओळख असलेल्या अभिनव सहकारी बँकेच्या पूर्वेकडील आयरे विभागातील शाखेचे स्थलांतर शुक्रवारी मोठ्या धूम-धडाक्यात झाले. बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश रतन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे पाटील यांच्या वाढदिवसाचे औतिच्य साधून संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

नुकत्याच संचालकांच्या राजीनामानाट्यानंतर लागलेल्या अभिनव सहकारी बँकेच्या निवडणूकीत रमेश पाटील प्रणित अभिनव पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या   रंगतदार निवडणूकीत अभिनव पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतरच हा सोहळा होत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. ठाणे जिल्ह्यात अग्रेसर बँक होण्यासाठी सर्व संचालक, कर्माचारी व ग्राहक यांच्या सहकार्याने प्रगतीचा आलेख चढता राखण्यासाठी मी प्राधान्य देत आहे असे रमेश पाटील उद्घाटन प्रसंगी म्हणाले.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश रतन पाटील यांच्या वाढदिवसाचे औतिच्य साधून बॅंकेतर्फे मुख्य शाखेतील सभागृहात यावर्षी इयता 10 वी -12 वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी माजी नगरसेवक दिलीप भोईर, अनिल पाटील, दिगंबर नेहते, संजय चौधरी, पोपटलाल भंडारी, ऍड. रोहिदास भंडारी, सुशील मनोहर, पौर्णिमा डहाके, उज्वला दुसाने, तुलसीराम चौधरी आणि प्रसाद सांगळे आदी संचालन उपस्थित होते.

अभिनव कल्पना अभिनव उपक्रम आणि केंद्रभागी ग्राहक हे बँकेचे ब्रीद असल्याने बँकेचा आलेख सतत चढत्या भाजणीत राहिला आहे. बँकेची स्थापना 1976 रोजी झाली असून 17 शाखा आणि मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून रमेश पाटील यांच्या कुशल नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने बँकेने सतत ‘अ’ वर्ग राखला आहे. बँकेला सन 2016-17 वर्षासाठी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने दर्जेदार सहकारी बॅंक म्हणून प्रशस्तीपत्रक देवून गौरविले आहे. बँकेने सातत्याने 14 टक्के लाभांश दिल्यामुळे बँकेकडे ठेवीदारांच्या संखेत भर पडत आहे. ठाणे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी प्रथम क्रमांकाची बॅंक असे रिझर्व बॅंक ऑफ इंडियानेही नमूद केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातील सर्व घटकांना वित्त पुरवठा करून मुख्य प्रवाहात आणून आर्थिक सक्षम  करण्याचे कार्य बॅंक करीत आहे. बँकेचे रूपे कार्ड असून डिजिटल आणि एस.एम.एस. बँकिंग सुविधा असून लवकरच मोबाईल अॅप होणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा असून संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. बँकेचा एकूण एन.पी.ए. फक्त 2 टक्के असून ग्रॉस एन.पी.ए. शून्य आहे. बँकेत एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी असून बँकेच्या स्वमालकीच्या सहा जागा आहेत असेही त्यांनी पुढे सांगितले.