डोंबिवली : ज्ञानसाधना ही एक चळवळ असून ती एक प्रक्रिया आहे. क्रिया लगेच थाबते, प्रक्रियेत सातत्य असावे लागते. आजच्या पिढीने घेतलेले वाचनसंस्कृती विस्ताराचे व्रत पुढील पिढीकडे सोपवायचे आहे. वाचनाची ज्ञान ज्योत सतत तेवत राहिली पाहिजे यासाठी वाढदिवस, सत्कार समारंभातून पुष्पगुच्छ, पुष्पहार देण्यापेक्षा एखादं पुस्तक किंवा ग्रंथ भेट द्या असे प्रतिपादन प्रा. डॉ. राम नेमाडे यांनी डोंबिवलीत केले.
पश्चिमकडील स्वामी विवेकानंद हायस्कूल राणाप्रताप येथे वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे 11,111 पुस्तकांचा विनामूल्य वितरण सोहळा आयोजित केला होता त्यावेळी नेमाडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुभाष वाघमारे, ॲड. यतीन गुजराथी, उपक्रम समन्वयक डॉ. राज परब, ज्योती परब, हेमंत नेहेते, साक्षी परब, संकेत खर्डीकर आदी उपस्थित होते.
यावेळी नेमाडे पुढे म्हणाले, नवरात्रोत्समध्ये आई भवानीच्या नावाने जागर मांडतात. हा जागर नऊ दिवस चालतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्तसुरू झालेला हा जागर मात्र अखंड सुरू राहिला पाहिजे. बौद्धिक विकासासाठी ग्रंथालये, वाचनालये यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. वाचन विविधांगी असू द्या. कविता, कथा, कादंबर्या, चरित्रे, आत्मचरित्रे वाचत रहा.
यावेळी प्रास्ताविकात उपक्रमाचे प्रमुख हेमंत नेहेते यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले. उपक्रमाचे प्रणेते डॉ. योगेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम कसा साकारला हे स्पष्ट केले. उपक्रम प्रमुख साक्षी परब हिने १२ वी कला शाखेतून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कसा पटकाविला. या यशाचे गमक उलगडून दाखविले आणि वाचनामुळे आदर्शभूत व्यक्तीमत्वे कशी घडतात हे उदाहरणासह दाखवून दिले. तसेच संकेत खर्डीकर याने जसा शरीराच्या विकासासाठी व्यायाम आवश्यक आहे तसेच मनाच्या विकासासाठी पुस्तके वाचली पाहिजेत असे सांगितले.
तर राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, आजवर जे यशस्वी स्त्री पुरुष होऊन गेले त्यांच्या यशाचे गमक म्हणजे वाचन. त्यामुळे वाचनाची सवय लहानपणापासूनच लाऊन घेतली पाहिजे.
अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे डोंबिवली येथे 65 शाळांना तसेच दुसऱ्या सत्रात संकल्प इंग्लिश स्कूल येथे 55 शाळांमध्ये 11,111 पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे.