हडपलेल्या पदपथावर पालिका प्रशासन कधी करणार कारवाई ?
( करदाता नागरिक मात्र शोधतोय चालण्यासाठी पदपथ )
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने काही प्रमाणात जरी रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्याची कामगिरी केली असली तरी पालिका परिक्षेत्रात दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पदपथ केव्हा ताब्यात घेणार अशी विचारणा सामान्य नागरिक करीत आहेत. नुकतेच पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदपथ मोकळे करा असे निर्देश पालिका प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यांची अंमलबजावणी तात्काळ होणे गरजेचे आहे यासाठी कागदी नोटिसा पाठवूनही दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र रस्त्यातील वाहतूक कोंडीमुळे करदाता नागरिक ना रस्त्यावरून ना पदपथावरून अशा कचाट्यात अडकत आहे.
शहरात दुकानदारांकडून पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांकडेही महापालिकेचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाचा त्याकडे होत असलेला कानाडोळा पाहता दुकानदारांनी जणूकाय पदपथ कायमचे खरेदी केले आहेत अशा थाटात त्यांनी त्यांच्या सामानाची मांडणी केली आहे. सामानांच्या अतिक्रमणाने पदपथ व्यापल्याने सांगा चालायचे कोठून असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे वाहतुकीवर परिणाम होऊन चालकांनाही कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्रासपणे डोंबिवलीत पाहावयास मिळते. दुकानातील अतिरिक्त सामान बिनदिक्कतपणे पदपथावर मांडले जात आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे आणि पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण असे चित्र शहरातील मुख्य रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. दुकानदारांनी शटरच्या आतील जागेचाच वापर करणे बंधकारक आहे. मात्र, दुकानदार आजही पदपथावरच सामान मांडून त्याची विक्री करताना दिसतात. त्यामुळे त्यांनी पदपथ गिळंकृत केल्याचे प्रत्येक रोडवर सर्रास दिसत आहे.
याबाबत काही दुकानदारांचे म्हणणे आहे की आम्ही रोज पावती फडतो त्यामुळे फूटपाथवर सामान ठेवले तर काय गुन्हा केला. मात्र याबाबत पालिका “ह” प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांनी सांगितले की नुमतेच आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार तसेच इतर काही कार्यालयावर कारवाई करण्यात येत आहे. ज्या दुकानदारांकडून पावती फाडण्यात येते ती स्वच्छते अंतर्गत असते त्यामुळे कोणालाही पदपथ बळकता येणार नाही. केवळ नागरिकांच्या चालण्यासाठी तो मोकळा असणार.
