डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील निर्बंध कडक केले आहेत. त्यानुसार व्यवसायाच्या वेळेत बदल केला आहे. मात्र डोंबिबलीतील व्यापारी वर्गांना त्या निर्बंधामधील वेळा त्रासदायक असल्याने त्यात फेरबदल करावा अशा विषयाचे निवेदन डोंबिबली व्यापारी महामंडळाचे सचिव नवीन मालदे यांनी आयुक्तांना दिले आहे.
आयुक्तांनी निर्देशित केलेल्या वेळापत्रकानुसार शहरात व्यवसाय उद्योग करणाऱ्या उद्योजकांना आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशा वेळेतच उद्योग व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्देशितवेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवल्यास त्या व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी व रविवारी पी-1 आणि पी-2 या धोरणानुसार दुकाने अथवा व्यवसाय करता येईल असे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू ठेवण्यात आली आहे.
परंतु असे करणे कोरोना काळात उचित असले तरी डोंबिवली व्यापारी महामंडळाने दुकाने-व्यवसाय सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत करता यावा अशी मागणी केली आहे. तसेच पी-1 व पी-2 ही पद्धतही लागू करू नये असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. याशिवाय सोमवार किंवा बुधवार एक दिवस संपूर्ण दुकाने-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यास तयार आहोत असेही म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान रात्री किती वाजेपर्यंत उघडे ठेवावे याची विचारणा केली आहे. आता यावर आयुक्त कोणती भूमिका घेतात या प्रतीक्षेत व्यापारी महामंडळ आहे असे सांगण्यात येत आहे.