मानपाडा (माणगाव) तलावाच्या दुषित पाण्यात गणपती विसर्जन नको !

( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयुक्तांना आग्रह )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माणगाव सोनारपाडा येथील वार्ड क्र.११६ मधील माणगाव येथील तलावाचे पाण्यात मागील एक वर्षापासून गटाराचे पाणी झिरपत असल्याने पाणी पुर्णपणे दुषित होऊन तलावात मोठ्याप्रमाणात वेली तयार झालेल्या आहेत. अशा स्थितीत रोगापासून बचाव करण्याकरिता यावर्षी तलावात गणपती, दुर्गामाता विसर्जन न करण्याचे ठरवले आहे. अशा माहितीचे पत्र पालिका आयुक्त आणि संबंधित प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण ग्रामिण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दत्तात्रय शांताराम वझे, कार्याध्यक्ष लालचंद भोईर, सरचिटणीस गजानन मांगरुळकर यांनी दिलेले आहे.

या सर्व परिस्थितीची जाणीव कक्ष कार्यालय व मुख्य उद्यान अधीक्षक यांनाही अवगत करून दिलेली आहे. परंतु पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही. त्यामुळेच रोगांपासून संरक्षण म्हणून सदरच्या तलावात गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामिण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे विभागातील गणेश विसर्जन कोठे करायचे हा गंभीर प्रश्न गणेशभक्तांना त्रासदायक ठरत आहे.
याबाबत प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय मुख्यालयात कळविला असून गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.