अधिकारी आणि ठेकेदार यांना खड्ड्यात ओणवे उभे करा !

( मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. श्रीगणपती उत्सव म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे काही प्रमाणात बुजविण्यात येत आहेत. तरीपण कल्याण-डोंबिवली ग्रामीण विभाग मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आजही दुर्लक्षित आहे. या परिस्थितीमुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच साद घातली आहे. रस्त्यातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला त्याच खड्ड्यात ओणवे उभे करा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत 27 गावे समाविष्ट झाली असली तरी त्यांच्या पायाभूत व मूलभूत सुविधांकडे अजिबात लक्ष नाही. लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार भेटी व पत्रव्यवहार करूनही अधिकारी फक्त होयबा असाच कामकाज करीत आहेत. हाजीमलंग रोड आणि कल्याण शीळ रोड आसपास असणारी आडीवली- ढोकली, आशेळे चिंचपाडा, भाल, दावडी, उंबर्लि, वसार, हेदुटने, कोळे, घारीवली, काटई, उसरघर आदी गावचे रस्ते खड्डेमय असून त्यातून कसा प्रवास करावा हे प्रत्येकाला उमजतच नाही. शाळेतील विद्यार्थ्यांनाही खड्डेमय रस्त्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते.

त्यामुळेच मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी रस्त्याच्या दुरवस्थेवरून ट्विट केलं आहे. हे ट्विट चर्चेला आले आहे. आमदार पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रस्त्यांच्या खड्ड्यांना कारणीभूत कोण अशी विचारणा करून ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यात ओणवे उभे करण्याची तरतूद करावी अशी मागणी गडकरींकडे केली आहे. जर चार चाकी गाडीतील सुरक्षेसाठी सीटबेल्ट बांधणं बंधनकारक असेल तर रस्त्यावरील खड्डयाचं काय यासाठीही उपाय पाहिजे असा प्रश्न याद्वारे विचारण्यात आला अडल्याची चर्चा आहे. आता गणेशोत्सव होऊन जाईल मग नंतर रस्ते दुरुस्तीही होण्याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या पाटील यांच्या ट्वीटकडे गडकरी कोणत्या माध्यमातून कारवाई करतील असेही बोलले जात आहे. याबाबत पालिका मुख्य अभियंता आपण कोळी-देवनपल्ली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेळ नाही असे सांगितले.