प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी
लोक- शास्त्र सावित्री नाटक !

( अभिनेत्री सायली पावसकर यांच प्रतिपादन )

डोंबिवली : जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही. हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया म्हणून “लोक – शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार, प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते असे वक्तव्य अभिनेत्री सायली पावसकर हिने केले.

डोंबिवलीत युग फाऊंडेशन आणि बहुजन समाज पार्टी तर्फे बीएसपी नेते दयानंद किरतकर यांचा जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. दयानंद किरतकर यांनी आपले सर्वस्व समाजासाठी खर्ची केले. समाज शिकला पाहिजे, स्वतःच्या ताकदीने पुढे आला पाहिजे असा त्यांचा बाणा होता. त्यांचेच कार्य पुढेही त्याच पद्धतीने चालू ठेवण्यासाठीच युग फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कल्पनाताई किरतकर झटत असतात. याच माध्यमातून त्यांनी दयानंद किरतकर यांच्या जयंती निमित्त रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित समतेचा एल्गार नाटक “लोक – शास्त्र सावित्री” या नाटकाचे सादरीकरण ठेवले होते. त्या दरम्यान अभिनेत्री सायली पावसकर यांनी नाटकाचे उद्दिष्ट सर्वांसमोर मांडले.

दरम्यान बीएसपी नेते दयानंद किरतकर यांच्या जयंती निमित्ताने इयत्ता 10 वी -12 वी परीक्षेत चांगले गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे अरविंद जोशी, सुरेश कुशलकर, ऍड. समीक्षा कांबळे, मनोज किरतकर, युगंधार किरतकर आणि कल्पनाताई किरतकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी बीएसपीचे कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष रविकिरण  बनसोडे, मधुकर बनसोड, सुरेंद्र गौतम, राकेश राम, दत्ता सावने, आनंद मोरे, रवी बागुल उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

समतेचा एल्गार असलेल्या “लोक – शास्त्र सावित्री”  या लोकनाट्यमध्ये अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे यांनी कला सादरीकरण केले.