मनसेने वेधले लक्ष : निवासी भागातील पोलिस कर्मचारी इमारती भग्नावस्थेत !

( दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, अनुचित प्रकाराला मिळेल आमंत्रण ! )

डोंबिवली : पूर्वेकडील औद्योगिक विभागातील निवासी भागात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रशस्त इमारती आहेत. सध्या या रिकाम्या इमारती भग्नावस्थेत असून त्याच्या आजूबाजूचा परिसर कचरायुक्त दुर्गंधीने वेढलेला आहे. भग्नाअवस्थेतील इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या दिसून येत आहे. याचा अर्थ या वास्तूचा वापर गैरकृत्यकरणारे लोक करीत आहेत. यामुळे येथे कोणतेही गैव्यवहारी प्रकरण घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी असे मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या लक्षात आणून दिली आहे.

पूर्वी असाच प्रकार पश्चिमेकडील बावन्नचाळ परिसरात होत होता. तेथील बंगले भग्नावस्थेत होते. त्यांचा कब्जा गर्दूल्ले, भिकारी, दारुडे आणि गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांनी घेतला होता. परिणामी तेथे अनेक घटनांनी पोलिसांची झोप उडवली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निवासी भागातील या पोलिस वसाहती परिसरात होवू नये. यासाठी मनसेचे विभागप्रमुख संजय चव्हाण व श्याम पिसके, शरद कोंढारकर, अजय घोरपडे आदी सहकाऱ्यांनी ही बाब उजेडात आणली आहे. या पोलिस वसाहती परिसरात असणाऱ्या इमारतीत पूर्वी पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी कुटुंबे वास्तव्य करीत होते. पोलिस वसाहत म्हणून एक वेगळी ओळख होती. निवासी विभागात पत्ता सांगण्यासाठी पोलिस वसाहतीचा लोकं आवर्जून उल्लेख करीत होते. पण आज हीच तो ओळखीची वास्तू भग्नावस्थेत असून समाजकंटक त्याचा दुरुपयोग करीत आहेत.

याविषयी संजय चव्हाण सांगतात की, एमआयडीसी विभागात 1990 च्या दशकात पोलीस वसाहत तयार करण्यात आली. पोलीस वसाहतीत मोठे मोठे पोलीस अधिकारी तसेच त्यांचे  कुटुंबीय राहत होते. त्याच्या मुलांसोबत तसेच पोलीस यांच्या सोबत मैत्रीपुर्ण संबध होते. पोलीस नावात धाक होता. पण कौटुंबिकसंबंध जिव्हाळयाचे होते. पण करोनानंतर एक एक करता सर्व पोलीस कुटुंबीय निघुन गेले. आता पुर्ण पोलीस वसाहत भग्नावस्थेत शेवटचे क्षण मोजत आहे. पोलीस वसाहत निर्मनुष्य असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊन  पोलीस खात्याला कोणतेही गालबोट लागु नये. या परिसरात जाळी अथवा पत्रे लावून प्रवेश बंद करावा अशी मागणी केली आहे.