हजारो वृक्षप्रेमींनीं “महावृक्षारोपण” यज्ञात वाहिली वृक्षरोपणाची समिधा

हजारो वृक्षप्रेमींनीं “महावृक्षारोपण” यज्ञात वाहिली वृक्षरोपणाची समिधा

डोंबिवली, दि. ५ (प्रतिनिधी) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मांगरुळ परिसरातील डोंगर माथ्यावर पंधरा हजार स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिकांनीं “महावृक्षारोपण” यज्ञात वृक्षारोपणाची समिधा वाहिली.  एक लाख पेक्षा अधिक वृक्ष लावून झाडे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडलेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या वारकऱ्यांमुळे या संपूर्ण परिसराला वारकरी दिंडीचे स्वरूप लाभले होते. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, एक लाख वृक्ष प्रत्यक्ष लावायचे म्हटले कि त्या प्रकारची जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. पण कलेक्टर कल्याणकर यांनी हे पठार देऊन जागेचा प्रश्न निकाली निघाला. ही सर्व झाडे जगवून एक मोठे जंगल होईल आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातील खरोखर “निसर्ग उद्यान” पहावयास मिळेल.

पर्यावरणाचे संवर्धन हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, या हेतूने खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून मांगरूळ येथे १ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी विविध संस्था-संघटना, शाळा, महाविद्यालये यांना आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सातत्याने बैठका घेतल्या. परिणामी, १५ हजारहून अधिक जणांनी या अभियानात सहभाग घेतला. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. महाराष्ट्र नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांचे विशेष सहकार्य या अभियानाला लाभले.

गेल्या महिन्याभरापासूनच या ठिकाणी या महाअभियानाची नियोजनबद्ध तयारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. या महाअभियानाचे उत्कृष्ट नियोजन हा सर्व उपस्थित मान्यवरांच्या कौतुकाचा विषय होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर पडलेले प्लास्टिकचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी साफ करून परिसर स्वच्छ केला.

याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती य

 

चौकट :

पावसाळ्यात खड्डे पडले कि महापौरांच्या नावाने खडे फोडले जातात. पण इथे या लाखो खड्ड्यात वृक्ष लावून एक नवा विक्रम होत आहे. कदाचित आज-उद्या या कार्याचे महत्व कळणार नाही. पण ४०-५० वर्षांनंतर समजेल कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमामुळे हि झाडे, जंगले दिसत आहेत. भविष्यात पुढे सर्व काही बदलेल पण हि जगलेली झाडे तशीच राहतील आणि राहिली पाहिजेत. कारण विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होता कामा नये. विकास व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर जंगलेही राहिली पाहिजेत.

— आदित्य ठाकरे

वृक्ष लागवड हि काळाचीे, समाजाची व पर्यावरणाची गरज आहे.  आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी होते आणि उद्धवसाहेबही तेच काम करीत आहेत. वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. आणि यासाठीच हे सर्व सुरु आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष एक लाख पेक्षा जास्त वृक्ष लागवड झाल्याचा आनंद होत आहे आणि हा एक विक्रम आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड होते पण इथे जी शिस्त आणि हजारो लोकांचा सहभाग आगळा-वेगळा आहे. आता आपल्याला झाडं लावून थांबायचं नाही तर जलयुक्त शिवार माध्यमातून कामं केली जात आहेत. जलयुक्त शिवरामुळे भाजीचे मळे फुलले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. झाडं लावून थांबू नका, झाडं जागवून त्यांची जंगलं झाली पाहिजे आणि पुढे मांंगरूळ एक पर्यटन स्थळ झालं पाहिजे.

— पालकमंत्री एकनाथ शिंदे