कळशी आणि बादली घेऊन महिला रस्त्यावर

डोंबिवली, दि. ०३ (प्रतिनिधी) : ऐन  पावसाळ्यातही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या 27 गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी आज सकाळी रिकामा हंडा आणि कळशी घेऊन रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. यावेळी 27 गावाच्या पाणी प्रश्नाचा एकदाच काय तो निकाल लावा अशी मागणी या महिलांनी  केली.

27 गावातील सोनारपाड्यातील नागरिकांनीही नुकतीच पाणी टंचाई विषयी केडीएमसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांची भेट घेतली होती. पत्र्यावर पडलेले पावसाचे पाणी साठवून कशाप्रकारे सोनारपाड्यातील नागरिक या पाण्याचा आधार घेत आहेत याच वास्तवही जगजाहीर आहे. आता पाणी टंचाईने ग्रासलेल्या नांदीवली गावातील महिलाही आक्रमक होऊन हंडा-कळशी घेऊन रस्त्यावर उतरल्या असल्याने आतातरी लवकर तोडगा निघाला नाही तर येत्या काळात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह पालिका परिक्षेत्रात दिलेलं अशी चर्चा आहे.

पाणी टंचाईचा प्रश्न गेली काही महिन्यांपासून अधिकच तीव्र झाला असून आता पाण्याचे टँकरही यायचे बंद झाल्यामुळे आम्ही करायचे तरी काय असा संतप्त सवाल या महिलांनी उपस्थित केला. पाण्याचा प्रश्न निकाली लावला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी महिलांनी दिला.