कल्याण, दि. १४ (प्रतिनिधी) : महापालिका पारीक्षेत्रात दि. १५ जूलै पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यांत आली आहे. प्लास्टिक पिशवी बंदी मोहिमेस मिळालेल्या प्रतिसादानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रातील शाळांमधुन ई कचरा व प्लास्टिक संकलन करणेबाबत महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी.वेलरासू, उपमहापौर मोरेश्वर भोईर व अन्य पदाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानंतर १४ ऑगस्ट रोजी शाळांमधुन विद्यार्थ्यांमार्फत ई कचरा संकलन करण्याचे ठरले. या संदर्भात बिर्ला महाविद्यालय येथे गत सप्ताहात सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांची बैठक आयोजित करण्यांत आली होती. या बैठकित १४ ऑगस्ट रोजी ई कचरा व प्लास्टिक गोळा करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यास अनुसरुन आज महापालिका क्षेत्रातील शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक आणि ई कचरा गोळा केला.
आज ई कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने सर्व शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना जमा झालेला ई कचरा व प्लास्टिक कचरा शाळेच्या आवारात जमा करुन ठेवण्याचा सुचना देण्यांत आल्या होत्या. पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागाकरीता १ असे १० प्रमुख आरोग्य निरिक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून ई कचरा संकलनाकरीता नेमणूक केली होती. महापालिकेने जमा झालेला ई कचरा डोंबिवली पूर्व प्रगती कॉलेज समोरील पाण्याची टाकी येथे, कल्याण पूर्व येथील ड प्रभागक्षेत्र कार्यालय, कल्याण पश्चिम करीता ब प्रभागक्षेत्र कार्यालय आणि आधारवाडी अग्निशमन केंद्र अशा ४ ठिकाणी कलेक्शन सेंटर उघडण्यांत आले होते.
महापालिकेच्या ई कचरा मोहिमेस व महापौरांनी केलेल्या आवाहनास विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी प्रतिसाद देवून ३०० किलो प्लॉस्टिक, २०० किलो ई कचराजमा करण्यांत आले आहे. सर्वात जास्त ई कचरा कल्याण पूर्वेतील शाळांमधुन तर प्लास्टिक कचरा डोंबिवली पश्चिम मधील शाळांमधुन जमा झालेला आहे. ई कचरा व प्लास्टिकच्या माध्यमातून शाळा व विद्यालयांना जो पैसा मिळणार आहे त्यास ”ग्रीन फंड” संबोधले जाणार असून त्याचा वापर शाळां विविध उपक्रमांस वापरणार आहे.