“निष्काम ज्ञानयज्ञ” माध्यमातून अरविंद्रनाथ महाराज यांना मानवंदना

डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : पू. गुरुजी म्हणजे धगधगते अग्निकुंड, शिष्याना त्यांच्या या अग्निकुंडाचे तेज आत्मप्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शक व प्रेरक ठरले आहे. ज्ञानाच्या कसोटीवर सेवा-समर्पण व निर्धाराची अनोखी शिकवण पू. गुरुजींनी दिली. आपल्या अपूर्व बुद्धिमत्तेने संपूर्ण ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यत प. पु. गुरुजी अरविंद्रनाथ महाराज रनाळकर यांनी पोहोचविण्याचे काम केले आहे. पू. गुरुजींच्या मार्गावर चालण्याचे घेतलेले व्रत हीच खऱ्या अर्थाने त्यांना मानवंदना असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक महाडिक केले.

ग्रथराजश्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठानच्या ३०व्या वर्ष पदार्पण सोहळ्या निमित्त सेवा प्रतिष्ठान कार्याध्यक्ष व विश्वस्त मंडळानी “निष्काम ज्ञानयज्ञा”चे आयोजन पूर्वेकडील नांदिवली टेकडी जवळील पटांगणात पार पडलेल्या सोहळ्यात महाडिक बोलत होते. यावेळी नगरसेवक राजेश मोरे, भाजप उपशहर अध्यक्ष अनिल ठक्कर, अधिकारी मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी महाडिक यांनी सांगितले कि, प. पु. गुरुजी श्री अरविंद्रनाथ महाराज रनाळकर यांचे देहावसन झाले   असले तरी त्यांनी आपल्या अपूर्व बुद्धिमत्तेने संपूर्ण ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम केले आहे.“कार्यमग्नता जीवन व्हावे! मृत्यू हीच विश्रांती” या उक्तीप्रमाणे आपले संपूर्ण जीवन समाजासाठीच आणि म्हणूनच श्री गीता व ज्ञानेश्वरी हे जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आपल्या व्यष्टी व समष्टी साधनेतून त्यांनी समाजाला शिकवले. केवळ कर्मकांड वा बुद्धीतर्कदृष्ठता यांचा अतिरेक न करता स्वधर्माच्या मार्गाचे काटेकोर पालन करून अनेक शिष्य घडवले. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अपारंपरिक दिंडीची संकल्पना समाजातील सर्व स्तरापर्यत ज्ञानेश्वरीचे जीवनव्रती घडवण्याचा एक ध्यास उराशी बाळगून ग्रथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची जनाष्टमी २ संप्टेंबर १९८८ स्थापना केली. सदर संस्थेमार्फत १९८९ मध्ये ज्ञानेश्वरी स्वर्णिमा या पाक्षिकाची सुरुवात झाली. १९९६ मध्ये श्री ज्ञानेश्वरी तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना करून समाजप्रबोधन करण्यासाठी भारतभर २८ मोठ्या अपारंपरिक दिंड्या मार्फत लाखो कि. मी प्रवास तसेच सुमारे  ३५०० प्रवचने, परिसंवाद, व्याखाने, अंदाजे ३५ जीवनमूल्य प्रशिक्षण शिबिरे, कार्यकर्ता प्रशक्षिन शिबीरे घेण्यात आली. देव संत आणि आपण, श्री गुरु सतशिष्य, जीवनमूल्य, विद्यापीठ प्रस्तावने-अध्यात्म्याच्या प्रागंणात भक्तीशास्त्र इ. अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. सन २०१२ पासून स्वधर्म-सूर्य हा दिवाळी विशेषांक काढण्यात येत असून सन १९९७ तरुण वयोगटातील मुलांसाठी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने गद्य उतारे पाठांतर स्पर्धांचे आयोजन केले. पू. गुरुजी म्हणजे धगधगते अग्निकुंड शिष्याना त्यांच्या या अग्निकुंडाचे तेज आत्मप्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शन व प्रेरक ठरेल.