सर्पदंश मृत्यू गांभीर्याने घेण्याची गरज : सोशल मिडियावर साप पकडण्याचे काम न करण्याचा निर्णय जाहिर

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : सरकारचे ठोस धोरण नसल्यामुळे सर्पमित्र म्हणून काम करुन पर्यावरण रक्षण करण्याचे काम करणे दिवसेंदिवस कठिण होत आहे. त्यामुळे यापुढे डोंबिवली शहरात कोठेही साप पकडण्याचे काम न करण्याचा निर्णय सर्पमित्रांनी सोशल मिडियावर जाहिर केला आहे. याला कारणही तसेच आहे, महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य प्रथमोपचार देखील न मिळाल्याने नुकताच एका सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरत शरद केणे (24) याला पकडलेला साप जंगलात सोडताना गुरुवार (7) रोजी रात्री जातीवंत नाग पोटाला चावल्याने मृत्यू  झाला. सोबतच्या सहकारी मित्रांनी त्याला तातडीने उंबार्ली येथून शास्त्रीनगर रुग्णालयात आणले. परंतू सर्पदंशावर उपचार करण्यासाठी लस येथे ऊपलब्ध नव्हती. इतकेच नव्हे तर येथील  डॉक्टरांनी त्या प्रकारचे विष आहे म्हणजे रक्तात भिनणारे व शरीरात पसरणारे किंवा मज्जासंस्थेवर आघात करणारे, त्याप्रमाणे प्रथमोपचार करणे गरजेचे असते. याबाबत जाणीव नव्हती त्यामुळे त्यांनी भरतला पाणी पिण्याची मुभा दिली. हे ही एक कारण त्याच्या मृत्युचे असू शकते असे त्याला रुग्णालयात  नेणाऱ्यानी सांगितले. दुसरे कारण येथे पोलिस नोंद करण्यासाठी पोलिसच नव्हते त्यामुळे सहकारी मित्रांना रामनगर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले यातही खूप वेळ गेला. त्यानंतर ठाण्याला हलविण्यास सांगितले वाहतुक कोंडी व एका उर्मट रिक्षा चालकाने रुग्णवाहिकेलावाट न देता दिलेली धडक यामुळे ठाण्यात पोहचण्याआधीच भरतचा दुर्दैवी अंत झाला. या भरतने गेल्या काही वर्षात डोंबिवलीतील सुमारे दोनशे युवकांना सापांबद्दल माहिती देऊन कसे पकडायचे व दूरवर जंगलात सोडून कसे पर्यावरणाचे रक्षण करायचे. सापांच्या दुर्मिळ जाती नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी भरत आपल्या सहकारी मित्रांसह झटत होता.

डोंबिवली जवळील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बांधकामांमुळे साप नागरी वस्तीत आसरा शोधतात, साप दिसला की नागरिकांची घाबरगुंडी उडून हाती मिळेल त्या वस्तूने साप मारुन टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु भरत व त्याचे सहकारी विषारी व बिनविषारी सापांची माहिती देऊन ते नष्टकरण्यापासून लोकांना परावृत्त करीत. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने भरतचा अंत झाला याला पालिका प्रशासन संपूर्णपणे जबाबदार आहे असे त्याच्या मित्रांचे ठाम मत आहे. सरकारकडून आवश्यक त्या सुविधा, ओळखपत्र, औषधोपचार मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही जोखीम घेऊन साप पकडण्यासाठी मदत करणार नाही असा निर्धार डोंबिवलीतील सर्पमित्रांनी केला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी तरी महापालिका व संबंधित लोकप्रतिनीधींनी ठोस धोरण तातडीने अंमलात आणण्याची गरज आहे.

सापांचे संरक्षण व संवर्धन हा खरा वन विभागाच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे परंतु  डोंबिवलीत वन विभागाचे कार्यालयच नाही. त्यामुळे वन विभागाने त्यांच्या मर्जीतील काही सेवाभावी संस्थांवर साप पकडण्याची जबाबदारी सोपवली आहे या संस्था नागरिकांकडून साप पकडण्यासाठी पाचशे ते दिड हजार रुपये पर्यत पैशांची मागणी करतात त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडणारे नाही. म्हणून वन विभागाच्या सहाय्याने पालिकेने साप पकडून योग्य संवर्धन करण्यासाठी तसेच सर्पदंशावर तातडीने उपचार करता येतील अशी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज सर्पमित्र सोशल मिडीयावर व्यक्त करीत आहेत.