डोंबिवली : पूर्वेकडील सुनीलनगर ध.ना.चौधरी शाळेजवळील ओम शिव गणेश गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतीला तडा गेल्याने इमारत तत्काळ खाली करणाच्या निर्देश महापालिका प्रशासनाने दिला. इमारतीतील 26 कुटुंबियांपैकी बहुसंख्य कुटुंबांनी आपली पर्यायी सोय केली असली तरी सहा-सात कुटुंबांची सोय पांडुरंग वाडीतील महापालिकेच्या रात्र निवारा केंद्रात करण्यात आला. इमारत राहण्याजोगी नसल्याची नोटीस पालिका प्रशासनाने दिल्यामुळे पुनर्रबांधणी शिवाय कोणताही पर्याय नाही. संबंधित इमारीचा दस्ताऐवज येत्या पालिका प्रशासनाकडे द्यावा. त्यानंतर कायदेशीर बाबी पहाणी करून पुनर्रबांधणी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालिका प्रशासन अशा परिस्थितीमुळे पुनर्रबांधणी परवानगी नक्कीच देईल कल्पनेमुळे आता इमारत पुन्हा उभी करण्यासाठी विकासकांची गर्दी होतील अशी चर्चा आहे.
बाधित “ओम शिव गणेश” सोसायटीला आज सकाळी आयुक्त गोविंद बोडके, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख राजेश मोरे याचेसह अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली. बाधित इमारतीतील नागरिकांनी आयुक्त गोविंद बोडके यांना सांगीतले की, आम्ही इमारत पुन्हा बांधण्यास तयार आहोत. मात्र इमारत पाडण्यापूर्वी आम्हाला तातडीने बांधकाम परवाना द्या. आता सदर इमारतीत आम्ही रहाणार नाही, आमच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आमचे नशीब बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली आहे.
नागरिकांच्या त्या व्यथा पाहून आयुक्त बोडके यानी रहिवाशाना दिलासा देताना सांगीतले की, तुम्ही सर्व कागदपत्र, नकाशा सादर करा व 15 दिवसात तुम्हाला इमारत बांधण्याची कायदेशीर परवानगी देण्यात येईल.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयुक्त बोडके यांच्याशी चर्चा केली व रहिवाशांची पर्यायी सोय करण्याची सूचना केली. शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, इमारत धोकादायक नसली तरी आता ती पुन्हा बांधण्यात येणार असून पर्यायी सोय केली आहे. कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही तर आमदार सुभाष भेाईर म्हणाले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्ताना निर्देश दिले की इमारत तोडण्यापूर्वी त्या सदस्यांना इमारत पुन्हा बांधण्याची परवानगी दिली पाहिजे. मुख्य म्हणजे एकही कुटुंब बेघर होणार नाही अशी काळजी घेण्याच्या सुचना त्यानी दिल्या.
दुर्दैवी घटना झाल्यापासूनच स्थानिक नगरसेवक मराठे आणि म्हात्रे यांनी बाधित कुटुंबीयांची काळजी घेतली. त्यांच्या राहण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या जेवण्याची व्यवस्था चोख केली होती. कोणताही त्रास होणार नाही याकडे लक्ष दिले गेले. मुख्य म्हणजे इमारतीतील लोकाचे सामान सुखरूप राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.