डोंबिवली : महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत कुचकामी ठरत असल्याने त्या २७ गावांचा भार कमी करण्यासाठी नवीन योजना ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांनी अस्तित्वात आणली आहे. स्वच्छ आणि सुंदर प्रभाग होण्यासाठी यांनी आर्थिक हातभार लावून चक्क “घंटागाडी” प्रभागाला दिली आहे. मात्र आतातरी स्वच्छता राखा असा सल्ला पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. ही योजना चांगल्या प्रकारे राबवली गेली तर ‘ई’ प्रभाग क्षेत्रातील सर्व प्रभागांना अशा प्रकारच्या घंटागाड्या नक्कीच देणार असे आश्वासन दिले.
२७ गाव हा ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय असला तरी या भागाचा विकास व्हावा या करीता आमदार सुभाष भोईर झटत आहेत. या भागात स्वच्छता व्हावी याकरीता आ. भोईर यांनी चंग बांधला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या घन कचरा विभागाला घ़ंटा गाडी पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. यातील पहिली घंटा गाडी नगरसेविका रुपाली म्हात्रे यांच्या नांदिवली पाडा (प्रभाग क्र.११२) प्रभागात आ. भोईर यांनी दिली. या गाडीचा शुभारंभ आ. भोईर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
यावेळी नगरसेविका रुपाली म्हात्रे, प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, दिपाली पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी अंबो म्हात्रे, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, पंढरी पाटील, योगेश म्हात्रे, प्रभाग क्षेत्र भागाजी भांगरे, आरोग्य अधिकारी विलास जोशी उपस्थित होते.
यावेळी भोईर म्हणाले कि, या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रिया सुलभ रितीने होण्यासाठी या घंटागाडीची मदत होइल. त्यामुळे या गाडीचा योग्यप्रकारे उपयोग प्रभागातील नागरिक करतील. अशा प्रकारचा पहिला प्रयोग शिळफाटा येथे आम्ही केला होता. अशा प्रकारच्या सुविधा तेथे दिल्याने तेथील परिसर स्वच्छ राहिला. आमदार निधीतून या घंटागाडीची सोय करण्यात आली. पालिकेच्या इतर प्रभागात मागणीनुसार घंटागाडी देण्यात येइल. मिलाप नगर येथील नगरसेविका पूजा म्हात्रे यांच्या प्रभागासाठी अशा गाडीची सुविधा देणार आहोत.