रेल्वे स्थानकावरील देखभाल दुरुस्ती कुचकामी, प्रवाशांच्या शेकडो तक्रारी [ आठ दिवसात फलाटावरील लाद्या तुटल्या ]

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाटाची ऊंची वाढविणे आणि जिन्यावरील लाद्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. फलाटावर नवीन लागलेल्या लाद्या आठ दिवसातच तुटल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून येत आहेत. विशेष म्हणजे नव्या लावलेल्या लाद्यांना तडे गेले आहेत. देखभाल दुरुस्ती म्हणून जरी लादी बसवण्याचे काम सुरु असले तरी ते काम निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी प्रवासी करत आहेत.

कल्याण दिशेकडील पूलावर लादी बसण्याचे काम करण्यात आले. तसेच मुंबई दिशेकडील पूलावर लाद्या बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान सध्या फलाट क्रमांक पाच वरील जिन्याच्या लाद्या बसवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कल्याण दिेशेला असलेल्या जून्या पूलावरील लाद्या बसवून काही दिवस झाले असून त्या लाद्यांना तडे गेले आहेत. काम सुरु असताना रेल्वेचा कोणतीही कर्मचारी देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित नसल्याने काम कुचकामी झाल्याचे उघड होत आहे. याबाबत प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाद्या बसवण्यात येत आहेत त्यांचा दर्जा निकृष्ठ असून लादी बसवल्यानंतर त्याच आठवडयात त्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या आहेत. लाद्या बसवण्यासाठी सिमेंट, रेती आदी साहित्यांचा वापर केला गेला ते साहित्य निकृष्ठ असल्याचा आरोप होत आहे. लाद्यांचा दर्जाही अत्यंत कमकुवत असल्याने त्या तुटत असून त्यांना तडे जातात असे एका तरुण व्यापारी प्रवाशांने सांगीतले.

याबाबत डोंबिवली रेल्वे स्थानकाचे महाव्यवस्थापक के. ओ. अब्रहम यांनी सांगितले कि, प्रवाशांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांची दखल घेतली असून ज्या लाद्या तुटल्या आहेत त्या बदलून दुसऱ्या लावण्यात आल्या आहेत. जिन्यावर ज्या लाद्या बसवण्यात येत आहेत त्या ग्रेनाईडच्या असून वेल्डिंग पटटी लावून त्यावर ग्रेनाइड लादी बसवण्यात येत असून हे काम येाग्य पध्दतीने केले जाता आहे. तर रेल्वेचे अभियंते दिपक पाटील यांनीही प्रवाशांच्या लाद्या बसवण्याबाबतच्या तक्रारी आल्याचे मान्य केले.